मुंबई : प्रतिनिधी
देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती भडकल्या आहेत. चार रुपयांनी प्रति लिटर इंधन महागले आहे. तर पेट्रोल आणि डिझेल अजून महागण्याची भीती विरोधक व्यक्त करत आहेत. इतक्यावरच ही दरवाढ थांबणार नसल्याचा दावा विरोधकांचा आहे. इंधन टंचाईसह मोठी वाढ होण्याचा दावा आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती प्रति लिटर २० रुपयांनी महागणार असल्याचा दावा आमदार आव्हाड यांनी केला आहे. त्यांच्या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे.
आठवडाभरात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत दोनदा वाढ झाली. पहिल्यांदा १५ मे रोजी पेट्रोल आणि डिझेलची किंमत प्रति लिटर ३ रुपयांनी वाढली तर १९ मे रोजी या किंमती ९० पैसे प्रति लिटरने वाढल्या. म्हणजे देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती प्रति लिटर ४ रुपयांनी वाढल्या. तर विरोधकांच्या दाव्यानुसार या दरवाढीच्या पाचपट किंमती वाढतील. म्हणजे इंधन प्रति लिटर २०रुपयांनी वाढेल. तेव्हाच सरकारी तेल कंपन्यांची नुकसान भरपाई होईल.
कोटक इन्स्टिट्युशनल इक्विटीजनुसार, कच्चा तेलाच्या जागतिक बाजारात किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे सरकारी तेल कंपन्यांना मोठे नुकसान होत आहे. त्यांचे हे नुकसान भरून काढण्यासाठी दरवाढ अटळ आहे. २०२२ मध्ये १३ वेळा थोडी थोडी दरवाढ करण्यात आली होती. नागरिकांमधून मोठी ओरड झाल्यानंतर चार वर्षात कोणतीही दरवाढ करण्यात आली नाही. पण आता सरकारी कंपन्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी देशात पेट्रोल आणि डिझेल प्रति लिटर १३ ते १७ रुपयांनी वाढवणे गरजेचे असल्याचा दावा करण्यात येत आहे. ही मोठी दरवाढ आहे. आता कंपन्या आणि सरकार याविषयी कोणता निर्णय घेते हे लवकरच समोर येईल.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत चार वर्षांनी मोठी वाढ झाली आहे. जागतिक बाजारातील कच्चा तेलाच्या किंमती वाढल्याने सरकारी तेल कंपन्यांना २५,००० कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. तर देशात अनेक ठिकाणी इंधन पुरवठा विस्कळीत झाला आहे. तो सुरळीत करण्याचे मोठे आव्हान सरकारसमोर आहे. नाहीतर देशभरात अनागोंदी होण्याची भीती व्यक्त होत आहे
















