लातूर : प्रतिनिधी
तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे हरितक्षत्र वाढविण्यासह झाडे लावण्याची गरज आहे. अशावेळी अति शीघ्र गतीने वाढणारे आणि बहुउपयोगी झाड आपल्याला लावणे गरजेचे आहे, ते झाड म्हणजे बांबू आहे. बांबू हा बहुउपयोगी आहे. त्यापासून शेतक-यांना चांगले उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे बांबु लागवड ही चळवळ बनावी, असे मत राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी वक्त केले.
औसा तालुक्यातील लोदगा येथील माळरानावर उभारलेल्या बांबू संशोधनाच्या भव्यदिव्य संशोधन केंद्रासमोर शेतकरी संवाद हा कार्यक्रम पार पडला. त्याप्रसंगी पाशा पटेल बोलत होते. पुढे बोलताना पाशा पटेल म्हणाले की, महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त तापमान औराद शहाजानीला दाखवले म्हणजे मरण आपल्या दारात आले आहे. भारत सरकार आपल्याला २० टक्के ग्रीनरी करा असे सांगत आहे, याचा अर्थ आपण लक्षात घ्यायला हवा. बांबूपासून इथेनॉल, थर्मलला लागणारा कोळसा बनतो, तांदूळ, लोणचे, मुरब्बा जीवनावश्यक वस्तू ब्रशपासून ते खुर्ची, कार्पेट सगळ्या वस्तू आणि कपडेही बनवले जातात. अन्न, वस्त्र, निवारा, ऑक्सिजन, कार्बन देते म्हणून पर्यावरणपूरक झाड म्हणून बांबू आलेला आहे.
याप्रसंगी नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्री लिमिटेडचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, कीर्ती उद्योग समूहाचे प्रमुख अशोक भुतडा, उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त्त करताना बी. बी. ठोंबरे म्हणाले की, काळाची पावले ओळखून आपण यात उतरायला हवे, बांबू उद्योग नुसता करुन भागणार नाही, त्यासाठी बांबू उत्पादन सुरुवातीला वाढवावे लागेल. हे उत्पादन वाढले तर एखादा कारखाना जिल्ह्यात उभारण्याचा मानस नॅचरल शुगरचा असेल, असेही त्यांनी सांगितले.