लातूर : प्रतिनिधी
शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या निमित्ताने नाट्य परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जागर नाट्यकलेचा स्पर्धा महोत्सवामध्ये नाट्यपद गायन स्पर्धेची अंतिम फेरी मुंबई येथे नुकतीच झाली. रिदम पाटील हिने तृतीय पारितोषीक पटकावले. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यांमधून अनेक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेसाठी लातूर येथून तीन स्पर्धकांची निवड झाली होती,
या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये येथील रिदम दत्ता पाटील हिने आपल्या गोड आवाजातील राधामाई या संगीत नाटकामधील ‘खेळेल का देव माझिया अंगणी‘ हे नाट्यगीत अतिशय उत्तम सादरीकरण करुन सर्व रसिकांची मने जिंकली व या स्पर्धेमध्ये तिने तृतीय पुरस्कार प्राप्त केला. या पुरस्काराचे स्वरुप रोख रक्कम दहा हजार रुपये मानचिन्ह व प्रमाणपत्र असे होते. विशेष म्हणजे ही स्पर्धा खुल्या गटामध्ये होती या स्पर्धेतील सर्वात लहान स्पर्धक रिदम होती, रोज सातत्यपूर्ण केलेल्या स्वरसाधनेचे हे फलित आहे असे तिने यावेळी सांगितले. मागील पाच वर्षांपासून ती लातूर येथील आरोह संगीत अकादमी मध्ये शास्त्रीय संगीताचे नियमितपणे अध्ययन करत आहे, तिला प्रा. शशिकांत देशमुख व डॉ. वृषाली देशमुख यांचे मार्गदर्शन मिळत आहे.
या यशाबद्दल संजय सुवर्णकार, डॉ. संदीपान जगदाळे, प्रा. हरीसर्वोत्तम जोशी, दिनकर पाटील, शंभूदेव केंद्रे, शरद होळकर, व्यंकटेश पांचाळ, डॉ. अजित जगताप, अतुल देऊळगावकर, अँड. शैलेश गोजमगुंडे, निलेश सराफ, काकासाहेब सोनटक्के, किशोर तरोने, मोतीपवळे, दत्ता पाटील इत्यादी मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.