जालना : प्रतिनिधी
मनोज जरांगे पाटील यांनी आज आंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली. मुंबईला जाण्यासाठी मराठा समाजाची जी तयारी सुरू आहे ती थांबण्यास त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सणावाराच्या आडून डाव टाकला आहे. मराठ्यांच्या पोरांवर दंगलीचे गुन्हे दाखल करण्याचा डाव आहे, असे ते म्हणाले.
आपल्याला मुंबईत आंदोलनासाठी परवानगी नाकारली आहे. मात्र, मी उद्या एक-दोन गाड्या घेऊन मुंबईला निघणार आहे. मी एकटाच आंदोलन करेल, मग तरी परवानगी देतील ना, असे जरांगे पाटील म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, उद्या १५ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता मी मुंबईला निघणार आहे. जीव द्यायची वेळ आली तरी मुंबईला जाणारच, दिलेला शब्द परत घेतला जाणार नाही. जीव देईल पण समाजाच्या प्रतिष्ठेला धक्का लागू देणार नाही, मी दोन गाड्या घेऊन निघणार आहे.
मुंबईला जाताना माझ्यासोबत केवळ दोन गाड्या असणार आहे. आणि पाच-दहा माणसांपेक्षा माझ्यासोबत कोणी नसेल. १५ तारखेला एकटा जाणार, मराठ्यांच्या वाटेतील काटे मला काढू द्या, मला खिंड लढू द्या, मग मी तुम्हाला कोणत्या दिवशी यायचं ते सांगतो.’, असे देखील ते म्हणाले.
याआधी जाहीर केलेल्या मार्गानेच मुंबईला जाणार, जेथे मुक्काम आहे तेथे मी मुक्काम करणार, समाजातील लोकांना, तालुक्यातील लोकांना तेथे भेटायला येता येणार आहे. जे स्टेज मुक्कामाच्या ठिकाणी तयार केले होते. तेथेच मी थांबणार आणि उपोषण सुरूच ठेवणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
मी मराठ्यांनी येऊ नका, असें म्हणतोय. वर्गण्या काढल्यात, गाड्या तयार ठेवल्यात, पण सांगतो की वर्गणी आणि गाड्यांना हात लावू नका, जशाच्या तशा ठेवा. .. गाड्य, पैसे योग्य कामास येणार आहेत. आता तुम्हाला तयारीला आणखी वेळ मिळाला आहे. ज्यानी दोन गाड्या तयार ठेवल्या असतील त्यांनी तीन गाड्य तयार ठेवा. , असे आवाहन त्यांनी केले.
तारीख दोन दिवस आधी सांगणार…
मनोज जरांगे म्हणाले, मराठ्यांनी तयार राहायचे आहे. मी एकटा जात असल्याने मला आडवून दाखवा. मराठ्यांना गाड्या तयार ठेवायच्या आहेत. महिलांनी तयार राहायचे आहे. मी दोन दिवस आधी मुंबईला कधी यायचे ते सांगणार आहे. मराठ्यांनी गावात, तालुक्यात, शहरात आंदोलन करायचे आहे.
















