मुंबई : प्रतिनिधी
मनोज जरांगे पाटील यांच्या भाषेवर सत्ताधा-यांकडून होणा-या टीकेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी चोख प्रत्युत्तर दिले. शोषितांची भाषा आणि शोषण करणा-यांची भाषा कधीही एक असू शकत नाही. सत्ताधा-यांच्या बोलण्यात नेहमी लपवाछपवी असते. सरकारने आधी तीन वेळा मराठा समाजाला दिलेली आश्वासने जाहीर करावीत, मग इतरांच्या भाषेची समीक्षा करावी.
सध्या राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आंदोलन पेटले आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे उपोषणाला बसले असून सध्या त्यांच्या भाषेवरून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. याच मुद्यावरून बोलताना काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ म्हणाले,
जातीनिहाय जनगणनेच्या माध्यमातून मराठा आरक्षणाचा प्रश्न अगदी सहज सुटू शकतो. मात्र, विविध घटकांना न्याय देण्याची राज्य सरकारची राजकीय इच्छाशक्तीच संपली आहे. त्यामुळेच हे आंदोलन जाणीवपूर्वक चिघळवले जात आहे. आंदोलनाच्या ठिकाणी वीज घालवणे, माईक सिस्टीम बंद करणे अशा खोडसाळ कारवाया करून समर्थकांमध्ये गोंधळ उडवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. पण असल्या दडपशाहीने मराठा समाजाचा आवाज बंद होणार नाही.
राज्यात कोरडा दुष्काळ; ५० हजारांची मदत द्या
सपकाळ म्हणाले, लांबलेल्या पेरण्या आणि पावसाने दिलेल्या ओढीमुळे पिके करपून गेली आहेत. आता पाऊस आला तरी खरीप वाचू शकत नाही. सरकारने तात्काळ दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपयांची सरसकट मदत द्यावी. तसेच कर्जाचे पुनर्गठन न करता संपूर्ण कर्जमाफीचा सुधारित शासन निर्णय काढून रबीसाठी मोफत खते, बियाणे उपलब्ध करून द्यावे.
एमपीएससी पेपरफुटी मोठे रॅकेट
एमपीएससीपरीक्षांमधील पेपरफुटी हे एक महाभयंकर रॅकेट आहे. मुख्यमंत्र्यांनी मर्जीतील अध्यक्ष आणि सचिव नेमून हे प्रकरण रफादफा करण्याचा प्रयत्न केला. सचिवांच्या तोंडाला प्रत्यक्ष शाई लावली की नाही, यापेक्षा संपूर्ण प्रकरणातून अध्यक्ष, सचिव आणि मुख्यमंर्त्यांच्या तोंडाला काळे फासले गेले आहे. या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत न्यायालयीन चौकशी करून दोषींना जन्मठेपेची शिक्षा व्हावी.
शहांचा मुंबई दौरा म्हणजे ‘मेवा संकल्प अभियान’
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त सुरू होणा-या सेवा अभियानावर टीका करताना ते म्हणाले, हा सेवा संकल्प नसून महायुतीचा ‘मेवा संकल्प’ आहे. आर्थिक राजधानी मुंबईतून भाजपला किती लूट करता येईल आणि कुंभमेळ्याच्या ३५ हजार कोटींमधील वाटप कसे करायचे, याचा हिशोब घेण्यासाठी अमित शहा आले आहेत. त्यांनी हिंमत असेल तर महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर करावे.
गायकवाड विरुद्ध महाले वाद ही ‘नुरा कुस्ती’
बुलढाण्यातील आमदार संजय गायकवाड आणि आमदार श्वेता महाले यांच्यातील संघर्षावर भाष्य करताना, हा वाद जनतेसाठी नसून कोणी किती भ्रष्टाचार करावा आणि कोणी किती दमदाटी करावी, यातून निर्माण झालेली नुरा कुस्ती आहे. एकमेकांच्या घराण्यावर चिखलफेक करणे जिल्ह्याच्या संस्कृतीला घातक आहे.
वाघाच्या हल्ल्यात शेतक-याचा मृत्यू; १ कोटींची मदत द्या
वर्धा जिल्ह्यातील रायपूर येथे वाघाच्या हल्ल्यात मृत शेतक-याचा मृतदेह अनेक तास पडून राहिल्याच्या घटनेवर त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. मानव-वन्यजीव संघर्ष विदर्भात गंभीर बनला असून, संबंधित शेतकरी कुटुंबाला १ कोटी रुपयांची तातडीने मदत देऊन शासनाने ठोस धोरण राबवावे, अशी मागणी त्यांनी केली.
















