पुणे : प्रतिनिधी
मी शरद पवार यांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती. पण केवळ मी साहेबांचा मुलगा नाही, म्हणून मला संधी मिळाली नाही; हा कोणता न्याय? असा सवाल अजित पवार यांनी केला आहे. शिरूरमधल्या सभेत बोलताना त्यांनी मनातील खदखद व्यक्त केली. पवार साहेब आमचं दैवत आहेत, पण ८० व्या वर्षानंतर तरी त्यांनी थांबलं पाहिजे, नव्या लोकांना संधी दिली पाहिजे.
दरम्यान, शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारानिमित्त आयोजित केलेल्या सभेत बोलताना अजित पवार यांनी त्यांची मन की बात सांगितली. पुढे बोलताना ते म्हणाले,
मी शरद पवार यांचा मुलगा असतो तर मला संधी मिळालीच असती. पण केवळ त्यांचा मुलगा नाही म्हणून डावलला गेलो. आम्ही दिवसरात्र काम केलं, सगळा जिल्हा सांभाळला असे अजित पवार म्हणाले. शरद पवार आमचं दैवत आहेत, त्याबद्दल दुमत नाही. परंतु प्रत्येकाचा काळ असतो. कुठंतरी ८० वर्षांच्या पुढं गेल्यानंतर थांबलं पाहिजे, नवीन लोकांना संधी दिली पाहिजे. मी पण आता ६० वर्षांच्या पुढे गेलो, आता किती दिवस थांबायचं? आम्हाला कधीतरी चान्स आहे की नाही? असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला. आम्ही काही चुकीचं वागतो का? त्यामुळे भावनिक होऊ नका, असे ते म्हणाले.
मी कामाचा माणूस आहे
शरद पवार यांच्याकडे जिल्हा बँक नव्हती, ती इतरांच्या हातात असायची. मी राजकारणात आल्यानंतर जिल्हा बँक ताब्यात घेतली. १९९१ पासून ते आजपर्यंत जिल्हा बँक, जिल्हा परिषद आपल्या ताब्यात ठेवली, असा दावा अजित पवार यांनी केला. पिंपरी-चिंचवड ताब्यात नव्हती, १९९२ पासून २०१७ पर्यंत ताब्यात ठेवलं आणि चांगलं शहर केलं. मी कामाचा माणूस आहे, मी एखादी गोष्ट मनावर घेतली की मी ती करतोच. बारामती कशा पद्धतीने बदलली ते एकदा येऊन बघा. अनेक लोक आम्हाला सांगतात, आम्हाला निवडून द्या, आम्ही आपल्या मतदारसंघात बारामतीसारखा विकास करू, असे अजित पवार म्हणाले.