परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत भाकृअनुप अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प यांच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या बैलचलित सुधारित शेती अवजारे कस्टम हायरिंग सेंटर स्थापनेसंदर्भात श्री स्वामी समर्थ कृषि विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट, दिंडोरी यांच्याशी सामंजस्य करार करण्यात आला. त्यानिमित्त नैसर्गिक शेती प्रशिक्षण कार्यक्रम दि. २४ जुलै रोजी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात संपन्न झाला.
अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. डॉ. इन्द्र मणि होते. प्रमुख पाहुणे म्हणून कृषिरत्न श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग, दिंडोरी प्रणित, नाशिक आबासाहेब मोरे उपस्थित होते. यावेळी संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव पुरभा काळे, विद्यापीठ अभियंता इंजी. दीपक कशाळकर, सहाय्यक नियंत्रक अनंत कदम, संशोधन अभियंता डॉ. दयानंद टेकाळे, ट्रस्टचे कार्यक्रम समन्वयक बाळासाहेब शिंदे, प्रगतशील शेतकरी उद्यान पंडित प्रतापराव काळे, श्रीमती ज्योती भूक्तार आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमामध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी, शाकंभरी सीड बँकेच्या प्रमाणपत्रांचे वितरण तसेच मान्यवरांचे मार्गदर्शन झाले.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरूंनी अध्यात्म आणि विज्ञान जेव्हा एकत्र येतात, तेव्हाच खरा विकास घडतो. अध्यात्माशिवाय विज्ञान अपूर्ण आहे. विद्यापीठ शिक्षणाबरोबरच संशोधन आणि विस्तार शिक्षणाच्या माध्यमातून जनसेवा व शेतक-यांच्या सेवा करण्यास प्राधान्य देत आहे. श्री स्वामी समर्थ सेवाभावी संस्थेद्वारे आदर्श व दिशादर्शक कार्य उभारले जात आहे. आपण पुण्याचे कार्य करत आहात. विकासासाठी शेती आणि शेतकरी यांची निवड करून आपण अत्यंत महत्त्वाचे कार्य हाती घेतले आहे, असे सांगून त्यांनी आबासाहेब मोरे यांचे अभिनंदन केले. सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करणे अत्यंत कठीण असते; मात्र आपण तपस्वी वृत्तीने हे कार्य करत आहात. त्यामुळे आपण ख-या अर्थाने तपस्वी आहात, असे आदरयुक्त उद्गार काढले.
यावेळी आबासाहेब मोरे म्हणाले की, विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान श्री स्वामी समर्थ संस्थान आत्मीयतेने शेतक-यांपर्यंत पोहोचवेल. शेती स्वावलंबी करण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येकाने आपल्या शेताच्या बांधावर वृक्षांची लागवड करून बांध सजीव करावेत. प्रत्येक शेतात गायी-गुरे असणे आवश्यक आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कितीही वाढला, तरी गाईंशिवाय शेती पूर्ण होऊ शकत नाही. गाय ही अध्यात्मिक तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे. गरजेनुसार करण्यात आलेल्या संकरामुळे देशी गाईंची प्रतिकारशक्ती कमी झाली असून, शुद्ध देशी गोवंशाचे संवर्धन करणे आवश्यक आहे. गाई-गुरांच्या आजारांवर नियंत्रणासाठी विविध वनस्पती उपयुक्त ठरतात. काही वनस्पतींच्या सान्निध्यामुळेही आरोग्यास लाभ होतो. त्यामुळे या विषयावर विद्यापीठाने अधिक मार्गदर्शन करावे, अशी त्यांनी विनंती केली. गाईचे शेण व गोमूत्र हे अत्यंत उपयुक्त असून, शेणामध्ये अनेक लाभदायक सूक्ष्मजीव आढळतात. गोमूत्रापासून तयार केलेल्या जैविक कल्चरचा वापर शेतीत करावा. तणनाशकांचा वापर टाळून तणांचा उपयोग भाजीपाला, सेंद्रिय खत किंवा औषधी निर्मितीसाठी करावा, असे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ. भगवान आसेवार यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. दयानंद टेकाळे यांनी केले. बैलचलित कृषी अवजारांचे कस्टम हायरिंग सेंटर श्री छत्रपती शिवाजी महाराज गोशाळा (राणीसावरगाव), श्री. सिद्धीगिरी कृषी विज्ञान केंद्र (कन्हेरी कोल्हापूर), गो विज्ञान अनुसंधान केंद्र (देवळापार, नागपूर) आणि श्री. स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन ट्रस्ट ( दिंडोरी, नाशिक) येथे स्थापन करण्यात आले आहेत. या कस्टम हायरिंग सेंटरमध्ये ११ बैलचलित कृषी अवजारांचा समावेश असून एक किंवा दोन बैलांच्या सहाय्याने चालविता येतील. त्यामुळे सामान्य शेतक-यांनाही त्याचा मोठा लाभ होईल, असे त्यांनी नमूद केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. वीणा भालेराव आणि डॉ. रणजीत चव्हाण यांनी केले.
















