बंगळुरू : आयपीएलच्या १९ व्या हंगामातील ३४ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आपला विजयरथ कायम राखत गुजरात टायटन्सवर ५ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीने फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही विभागात चमकदार कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने युवा सलामीवीर साई सुदर्शनच्या शानदार खेळीच्या जोरावर २० षटकांत ३ बाद २०६ धावांचा भक्कम डोंगर उभारला. पण विराट कोहली पुन्हा एकदा ‘चेस मास्टर’ ठरला. त्याने तुफानी फलंदाजी करत डाव सांभाळला आणि निर्णायक क्षणी फटकेबाजी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. शेवटी आरसीबीने ५ गडी राखून हा सामना जिंकला.
गुजरात टायटन्सची सुरुवात कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी १२८ धावांची भागीदारी रचली. सुदर्शनने आक्रमक फलंदाजी केली. त्याला गिलने संयमी खेळ करत साथ दिली. मात्र, गिल २४ चेंडूत ३२ धावा करून बाद झाला. तथापि, साई सुदर्शन शेवटपर्यंत ठाम उभा राहिला आणि त्याने आयपीएलमधील तिसरे शतक पूर्ण केले. ५७ चेंडूत त्याने शतक झळकावले. त्यानंतर बटलरने १६ चेंडूत २५ धावा केल्या. शेवटच्या षटकांत वॉशिंग्टन सुंदर (१२ चेंडूत नाबाद १९) आणि जेसन होल्डर (१० चेंडूत नाबाद २३) यांनी जोरदार फटकेबाजी करत गुजरातचा स्कोर २०६ पार नेला.
या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीला सुरुवातीलाच धक्का बसला. विराट कोहली आणि जेकब बेथेल यांनी डावाची सुरुवात तुफानी केली. परंतु मोहम्मद सिराजने बेथेलला बाद केले. त्याने १० चेंडूत १४ धावा केल्या होत्या. यानंतर कोहलीला देवदत्ता पडिक्कलची साथ लाभली आणि दोघांनी दुस-या विकेटसाठी ११५ धावांची भक्कम भागीदारी रचली. पण रशीद खानने पडिक्कलला बाद करत ही जोडी फोडली. पडिक्कलने २७ चेंडूत ५५ धावांची तुफानी खेळी केली.
दरम्यान, कोहलीनेही आक्रमक फलंदाजी कायम ठेवत शानदार ८१ धावांची खेळी साकारली. जेसन होल्डरने त्याला बाद केले. कोहलीने ४४ चेंडूत ८ चौकार आणि ४ षटकारांसह ८१ धावा ठोकल्या. मात्र त्यानंतर आरसीबीचा डाव थोडा डगमगला. जितेश शर्मा १० धावा करून पुन्हा राशिद खानचा बळी ठरला तर मानव सुथारने कर्णधार रजत पाटीदारला ८ धावांवर माघारी धाडले. शेवटी कृणाल पांड्या आणि टीम डेव्हिड यांनी शांतपणे डाव सावरत आरसीबीला विजय मिळवून दिला.

