पुणे : माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी पुलोदचा प्रयोग केला, त्यानंतर त्यांनी त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला होता, हा त्यांचा इतिहास आहे. तसेच, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी या निवडणुकीत दोन पक्ष संपणार असल्याचे भाकित केले, त्यावरून विलीनीकरण होणार हे लक्षात आले असेलच.
लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा पराभव स्पष्ट दिसत असल्याने पवार यांना त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, उमेदवार मुरलीधर मोहोळ, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, लोकसभा प्रभारी श्रीनाथ भिमाले, आदी उपस्थित होते.
बावनकुळे म्हणाले, निवडणुकीमध्ये इलेक्टोरल बॉण्डमधून मिळालेले पैसे वाटले जात आहेत असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता, त्यावर बावनकुळे यांनी टीका करत चव्हाण यांचे हे वक्तव्य अपरिपक्व आहे. बॉण्डमधून मिळालेल्या पैशाचा हिशेब प्राप्तिकर विभागाला द्यावा लागतो. निवडणुकीत पैसे वाटप करण्याचे उद्योग हे काँग्रेसचेच आहेत. बारामतीच्या निवडणुकीत पैसे वाटपाचे व्हीडीओ व्हायरल करणे, तक्रारी करणे हा विरोधकांचा नियोजित कट होता, अशी टीका बावनकुळे यांनी केली.