अँटिलियासमोर स्फोटके, हिरेन हत्या प्रकरणी चालणार खटला
मुंबई : प्रतिनिधी
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्याच्या आणि उद्योगपती मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या बहुचर्चित प्रकरणात मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाने मोठा निर्णय घेत बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे आणि माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासह एकूण १० आरोपींविरोधात अखेर ५ वर्षांनंतर आरोप निश्चित करण्यात आले आहेत.
आरोप निश्चित झाल्यामुळे या हायप्रोफाइल प्रकरणाच्या प्रत्यक्ष सुनावणीचा आणि खटल्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. सर्व आरोपींविरुद्ध बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा (यूएपीए) आणि भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) विविध गंभीर कलमांखाली खटला चालवला जाणार आहे. २५ फेब्रुवारी २०२१ रोजी दक्षिण मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर बेवारस सोडलेली एक संशयित स्कॉर्पिओ गाडी आढळून आली होती. या गाडीत जिलेटिनच्या २० कांड्या आणि धमकीचे पत्र सापडले होते.
त्यानंतर अवघ्या काही दिवसांत म्हणजेच ५ मार्च २०२१ रोजी या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीत रहस्यमय परिस्थितीत आढळून आला. मनसुख हिरेन यांची हत्या सचिन वाझे आणि त्यांच्या सहका-यांनीच केल्याचा गंभीर आरोप हिरेन यांच्या कुटुंबीयांनी केला होता. गेल्या ५ वर्षांपासून या प्रकरणात डिस्चार्ज अर्ज आणि विविध याचिकांमुळे आरोप निश्चितीची प्रक्रिया प्रलंबित होती. मात्र, आता एनआयए न्यायालयाने आरोपींवर अधिकृतपणे यूएपीए आणि हत्येशी संबंधित कलमांखाली दोषारोप निश्चित केल्याने साक्षीदारांची साक्ष नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होऊन खटल्याची सुनावणी वेगाने पार पडणार आहे.
एटीएसकडून
एनआयएकडे तपास
सुरुवातीला या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र एटीएसकडे होता. मात्र घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्रीय गृह मंत्रालयाने हा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवला. तपासादरम्यान एनआयएने कारवाई करत खालील आरोपींना अटक केली.
१० जणांना केली होती अटक
एन्काउंटर स्पेशालिस्ट आणि मुख्य सूत्रधार म्हणून सचिन वाझेला अटक केली. तसेच एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मालाही याच प्रकरणावरून अटक केली होती. यासोबतच विनायक शिंदे, नरेश गोर, रियाझुद्दीन काझी यांच्यासह एकूण १० जणांना अटक करण्यात आली.
















