लातूर : प्रतिनिधी
राज्यात प्रतिबंधित गुटख्याची अवैध वाहतूक व विक्री रोखण्यासाठी लातूर जिल्हा पोलीस दलाने सुरू केलेल्या विशेष मोहिमेंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत १ लाख २० हजार ३२० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली कार असा ४ लाख ७० हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांची चाहूल लागताच वाहनचालकाने कार रस्त्याच्या कडेला सोडून अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. त्याचा शोध सुरू असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार तसेच अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली अवैध धंद्यांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान दि. २ जुलै २०२६ रोजी रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पथक देवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वलांडी येथे गस्त घालत असताना गुप्त माहितीदारामार्फत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा मारुती सुझुकी सेलेरिओ (एमएच ०४ केएल १३७२) या कारमधून विक्रीसाठी आणला जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने वलांडीझ्रदवणहिप्परगा मार्गावरील सापळा रचला. रात्री सुमारे १०.१० वाजण्याच्या सुमारास संशयित वाहन दिसताच पोलिसांनी ते थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांची उपस्थिती लक्षात येताच चालकाने कार रस्त्याच्या कडेला उभी करून अंधाराचा फायदा घेत शेतामध्ये पळ काढला.
पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता वाहनात महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेला मोठ्या गुटखा साठा आढळून आला. यामध्ये विमल पान मसाला, व्ही-१ तंबाखू, आर.एम.डी. पान मसाला तसेच एम. सेंटेड गोल्ड तंबाखू असा एकूण १ लाख २० हजार ३२० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली ३ लाख ५० हजार रुपये किमतीची मारुती सुझुकी सेलेरिओ कार तसेच एक मोबाईल फोन असा ४ लाख ७० हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ च्या कलम ५९ अन्वये देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे. लातूर जिल्हा पोलीस दलाकडून प्रतिबंधित गुटखा, मादक पदार्थ, अवैध धंदे आणि जनआरोग्यास धोका निर्माण करणा-या बेकायदेशीर व्यवसायांविरुद्ध यापुढेही अशाच धडक कारवाया सातत्याने सुरू राहणार आहेत.















