लातूर : योगिराज पिसाळ
खरीप हंगामात कमी कालावधीत अधिक नफा कमावण्यासाठी नामांकीत कंपन्या सोयाबीनचे बियाणे तयार करून बाजारात विक्रीसाठी आणतात. खोटया जाहिरातीला बळी पडून शेतकरी सोयाबीनचे बियाणे खरेदी करतात. या नामांकीत कंपन्यांचे बियाणे शेतक-यांच्या शेतात उगवलेच नाही अशा तक्रारी शेतकरी करत आहेत. तर दुसरीकडे कृषि विभागाच्या अधिका-यांनीही सोयाबीन बियाणांचे नमुने घेऊन उगवण क्षमता तपासण्यासाठी प्रयोग शाळेकडे पाठवले होते. यात नामांकीत कंपण्यासह इतर कंपण्यांच्या सोयाबीन बियाणांचे ५५ नमुने फेल झाले असल्याचा अहवाल कृषि विभागाकडे प्राप्त झाला आहे. अप्रमाणीत सोयाबीन बियाणांच्या संदर्भाने दुकानदार, वितरक व कंपन्यांना कृषि विभागाने नोटीसा दिल्या आहेत.
लातूर जिल्हा सोयाबीन हब म्हणून नावा रूपाला आला आहे. खरीप हंगामात शेतक-यांची नगदी पिक म्हणून सोयाबीन व तुरीच्या पिकावर मदार आहे. खरीप हंगामासाठी अनेक कंपन्या शेतक-यांकडून व इतर मार्गाने सोयाबीन खरेदी करून त्यावर प्रक्रिया करून बियाणे विक्रीसाठी बाजारात आणतात. या कंपण्याचे बियाणे तपासणीत पासही होते. मात्र प्रत्यक्ष शेतक-यांच्या शेतात पेरणी झाल्यानंतर या नामांकीत कंपन्यांच्या बियाणाला कोंबही फूटत नाही. त्यामुळे शेतक-याला पेरणी, खत व बियाणांचा आर्थिक फटका बसतो. शेतक-यांनी तालुका स्तरावर कृषि विभागाकडे तक्रार केली की कारवाईला बगल देण्यासाठी कंपन्या शेतक-यांना बदली बियाणे देऊन प्रकरण मिटवून टाकतात. मात्र शेतक-यांचा खताचा व पेरणीचा खर्च कोण देणार असा प्रश्न निर्माण होत आहे.
लातूर जिल्हयात पावसा अभावी खरीप हंगामातील पेरण्या ५० टक्के क्षेत्रावर सुध्दा पूर्ण झाल्या नाहीत. कृषि विभाग, तज्ञ व हवामान विभागाकडून येत्या २१ तारखेच्या नंतर पावसाचे आगमन होईल. त्यासाठी सध्या अनुकूल वातावरण तयार होताना दिसून येत आहे. लवकर पाऊस झाल्यास पेरलेल्या पिकांना उभारी व जिवनदान मिळणार आहे. तर उर्वरित शेतक-यांच्या पेरण्या मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
बियाणे उगवले नसल्याच्या २४१ शेतक-यांच्या तक्रारी
खरीप हंगामासाठी जिल्हयात अद्याप सर्वत्र पाऊस झाला नाही. ज्या ठिकाणी पेरणी योग्य पाऊस झाला, अशा ठिकाणी शेतक-यांनी खरीपाच्या पेरण्या उरकल्या आहेत. शेतात पेरलेले बियाणे ८ ते १० दिवसानंतरही उगवल्याचे दिसत नसल्याने जिल्हयातील २४१ शेतक-यांनी सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी तालुका स्तरावर केल्या आहेत. त्यापैकी १३४ ठिकाणी तालुका बियाणे तक्रार निवारण समिती मार्फत तक्रारींचे पंचनामे करण्यात आले आहेत. तर ३४ शेतक-यांना बियाणे बदलून देण्यात आले आहेत. तर उर्वरीत ठिकाणी पंचनामे सुरू आहेत. सर्वाधिक तक्रारी या महाबिजच्या बियाणांसंदर्भात आहेत.
बियाणे तपासणीचे ९३ टक्के उद्दिष्ट पूर्ण
खरीप हंगामासाठी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत ९७५ सोयाबीन बियाणांचे नमुने काढयाचे उद्दिष्ट असून आज पर्यंत ९३ टक्के म्हणजेच ९१२ नमुने कृषि विभागाच्या तालुका, जिल्हा व विभागीय अधिका-यांनी घेतले असून ते प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले होते. यात ५५ नमुने अप्रमाणीत आले आहेत. यात अहमदपूर तालुक्यातील १४, औसा व निलंगा प्रत्येकी ९, शिरूर अनंतपाळ ७, लातूर ५, उदगीर ४, रेणापूर ३, चाकूर २, तर देवणी व जळकोट तालुक्यातील लॉटचे प्रत्येकी १ असे नमुने अप्रमाणीत आले आहेत. त्यानुसार ४८ कृषि दुकानदार, बियाणे वितरक व कंपनीला नोटीसा बाजावल्या आसून त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही होणार आहे. बियाणे तपासणीसाठी नमुने घेण्याचे उदिष्ट ९३ टक्के पूर्ण झाले असून ते जुलै अखेर पूर्ण होईल, अशी माहिती जिल्हा मोहिम अधिकारी मिलींद बिडबाग यांनी दिली.
















