हिंगोली : प्रतिनिधी
हिंगोली जिल्ह्याला पुन्हा एकदा भूकंपाचे हादरे बसले आहेत. पहाटे सर्वजण गाढ झोपेत असताना हिंगोलीच्या औंढा व कळमनुरी तालुक्यातील १५पेक्षा अधिक गावांत हादरे बसले. भूकंपाची तीव्रता ३.५ रिश्टर स्केल इतकी नोंदण्यात आली आहे. कडाक्याच्या थंडीमध्ये नागरिक झोपेत असताना भूकंप झाल्याने १५ तालुक्यांत एकच धावपळ उडाली. नागरिकांनी घराबाहेर पळ काढला. काही सेकंदांसाठी जमीन हादरली पण त्यामुळे एकच खळबळ उडाली. भूकंपाच्या धक्क्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
मंगळवारी सकाळी पाच वाजून ५५ मिनिटांनी हिंगोलीमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला. दरम्यान कळमनुरी तालुक्यातील माळधामणी गावात सुरेश बांगर यांच्या दुकानापुढे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यात भूकंपाचे दृश्य कैद झाले आहे. या आधी देखील पिंपळदरी, पांगरा शिंदे, बोल्डा, रामेश्वर, आमदारी या गावांतील परिसराला भूकंपाचे हादरे बसले आहेत. आज सकाळी झालेल्या या भूकंपाची लातूर येथील भूमापक केंद्रावर नोंद करण्यात आली.
वापटी, कुपटी, खांबाळा, खापरखेडा, शिरली, राजवाडी, बोलडा, आमदरी, राजदरी, पिंपळदरी जामगव्हाण, नांदापूर व इतर गावांमध्ये या आधी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
३.५ रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेचा हा भूकंप असल्याची माहिती हिंगोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिका-यांनी दिली आहे.
मागील पाच वर्षांपासून या भागात सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. कधी सकाळी, दुपारी तर कधी संध्याकाळी हे भूकंपाचे हादरे नागरिकांना बसत आहेत. मात्र अनेक वेळा या धक्क्यांची तीव्रता कमी-जास्त असल्याने नागरिकांमध्ये सतत भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागासह केंद्र शासनाच्या पथकाने देखील या परिसरात येऊन पाहणी केली आहे. नागरिकांनी भूकंपाच्या वेळी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

