लातूर : प्रतिनिधी
लातूर लोकसभा निवडणूकीचे पडघम वाजत असताना प्रशासनानेही मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी कंबर कसली आहे. लातूर जिल्हा परिषदेच्या पंचाय विभागाने गटविकास अधिकारी यांना पत्र काढून दि. १ मे रोजी महाराष्ट्र दिनी होणा-या ग्राम सभेत दि. ७ मे रोजी हाकेणा-या लातूर लोकसभा निवडणूक कार्यक्रमाच्या अनुषंगाने गावात मतदार जनजागृती कार्यक्रम राबविण्याच्या सुचना दिल्या आहेत.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम ७ नूसार नियमितपणे विहीत कालावधीमध्ये चार ग्रामसभांचे आयोजन करण्याची तरतुद आहे. ग्रामसभेच्या बैठकी अगोदर पंचायतीची सभा बोलविली पाहिजे. तसेच ग्रामसभेच्या महिला सदस्यांची सभा पोटकलम (१) अन्वये बोलाविलेल्या ग्रामसभेच्या प्रत्येक नियमित सभेपूर्वी घेणे बंधनकारक आहे. त्याअनुषंगाने ग्रामसभेत १ मे रोजी मागील ग्रामसभेचे प्रोसिडींग वाचून कायम करणे, मागील केलेल्या जमा व खर्चास योजनेप्रमाणे बाबवार मान्यता घेणे, दि. ७ मे रोजी होणा-या लोकसभा निवडणूक कार्यक्रमाच्या अनुषंगाने गावात मतदार जनजागृती कार्यक्रम राबवविणे, ग्राम स्तरावरील इतर अनुषंगिक विषय ग्रामसभेत घेवून सदर ग्रामसभेसाठी गावातील सर्व नागरिकांना तसेच शासकिय, निमशासकिय कर्मचा-यांना ग्रामसभेस उपस्थित राहणेकरीता ग्रामसभेची वेळ व दिनांक कळवावा. त्याचबरोबर ग्रामसभेची सुचना पाठविणेत यावी. सदर ग्रामसभा ही निवडणूक कालावधीत येत असल्याने आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.