महाराष्ट्रातील ८८ जणांचा समावेश, मृतांची संख्या ३५९ वर
काठमांडू : वृत्तसंस्था
तिबेटमधील भूस्खलन आणि भोटेकोशी नदीला आलेल्या पुरामुळे नेपाळमध्ये मोठी नैसर्गिक आपत्ती कोसळली. पुरात आतापर्यंत ३५९ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण बेपत्ता आहेत. यामध्ये भारतातील २८८ नागरिक अडकल्याची माहिती मिळत आहे. यात महाराष्ट्रातील ८० नागरिकांचा समावेश आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी राज्य सरकारने हेल्पलाईन सुरू केली आहे. दरम्यान, या महाप्रलयानंतरही नेपाळमधील धोका टळलेला नाही. पुढील ३ दिवस धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
तिबेटमध्ये बुधवारी हिमनदी फुटल्यानंतर चीन-नेपाळ सीमा भागात प्रचंड विध्वंस झाला. पूर आणि ढिगा-यांमुळे शेकडो लोकांचा मृत्यू झाला तर मोठ्या प्रमाणात लोक अजूनही बेपत्ता आहेत. आतापर्यंत ३५९ हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. रसुवामधून १७, नुवाकोटमधून २८, धाडिंगमधून ३३, चितवनमधून १३२, गोरखामधून ३०, तनहुनमधून २२, नवलपरासी पूर्वेतून ८२ आणि नवलपरासी पश्चिममधून १५ मृतदेह सापडले आहेत. पोलिस, लष्कर आणि इतर मदत संस्था बाधित भागात सातत्याने बचावकार्य करत असून, अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. भारतानेही नेपाळच्या खांद्याला खांदा लावून मदतकार्य करण्याचा निर्णय घेतला असून, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या नेतृत्वाखाली हे कार्य सुरू आहे.
या दुर्घटनेत १५०० हून अधिक लोक बेपत्ता आहेत. बेपत्ता झालेल्यांमध्ये मोठ्या संख्येने परदेशी पर्यटकांचा समावेश आहे, जे एक तर ट्रेकिंगसाठी या भागात पोहोचले होते किंवा हिंदू पवित्र स्थळांना भेट देत होते. दरम्यान, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार नेपाळमधील २८८ भारतीय नागरिकांशी अजूनही संपर्क झालेला नाही. यापैकी ७३ जण त्रिशुली-१ वीज प्रकल्पात काम करतात. पुरात अडकलेल्या २१ भारतीयांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून, त्यापैकी ११ जणांची ओळख पटली आहे.
या महापुराच्या तडाख्यात तब्बल ५१७ विदेशी लोक बेपत्ता झाले आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने १०० चिनी नागरिक बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली. तसेच ३०० भारतीयही बेपत्ता झाले आहेत. युक्रेनमधील ५३, ऑस्ट्रेलियाचे ३५, ब्रिटेनचे ३३, कॅनडाचे २५ नागरिक बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले. सिंगापूर, जर्मनी, रशियाचे प्रत्येकी ८ पर्यटकही बेपत्ता आहेत.
त्यातच नेपाळमध्ये चोचेन खोला आणि पुरपू त्सांगपो नद्यांच्या संगमाजवळ एक मोठे जलाशय तयार झाले असून गुरुवार सकाळपर्यंत त्यात अंदाजे २० लाख घनमीटर पाणी साचले आहे आणि हे जलाशय आधीच ओसंडून वाहत आहे. पुढील ३ दिवसांत या जलाशयात आणखी ३० लाख घनमीटर पाणी येण्याची शक्यता असून, त्यामुळे जलाशय फुटण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे, असा इशारा चीनच्या जलसंपदा मंत्रालयाने दिला.
१५०० नागरिक
अद्याप बेपत्ता
बुधवारी सकाळी नेपाळ-तिबेट सीमेवर आलेल्या पुराच्या तडाख्यानंतर आतापर्यंत ३५९ मृतदेह सापडले तर सुमारे १५०० लोक अजूनही बेपत्ता आहेत. बेपत्ता झालेल्यांमध्ये नेपाळी नागरिकांसोबत मोठ्या संख्येने परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. नेपाळमधील लष्कर, पोलिस आणि सशस्त्र पोलिस पथके बेपत्ता झालेल्यांचा शोध घेत आहेत.
मदत व बचावकार्य वेगात
पुराच्या पार्श्वभूमीवर नेपाळच्या त्रिशुली प्रदेशात मदत आणि बचाव कार्य तीव्र झाले आहे. खराब झालेले रस्ते आणि इतर मार्गांमुळे अडकलेल्या लोकांना हेलिकॉप्टरद्वारे बाहेर काढले जात आहे. लष्करी आणि खाजगी हेलिकॉप्टरच्या मदतीने आतापर्यंत १०० हून अधिक लोकांना पूरग्रस्त भागातून बाहेर काढण्यात आले.
भारताकडून मदतकार्य
नेपाळला मदत करण्यासाठी इंडियन भारतीय हवाई दलाचे सी-१७ विमान काठमांडूत दाखल झाले. या विमानाद्वारे औषधी आणि खाण्या-पिण्याच्या साहित्यासह ३७.५ टन सामान नेण्यात आले आहे. यासोबतच पुरामुळे खराब झालेले रस्ते आणि पूल दुरुस्त करण्यासाठी भारत नेपाळला बेली ब्रिज पाठवणार आहे. हा एक पोर्टेबल आणि पूर्वनिर्मित पूल आहे, जो आवश्यक ठिकाणी त्वरित उभारला जाऊ शकतो.
















