पुणे : राज्य मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल चालू मे महिन्यातच जाहीर होणार असून बारावीचा निकाल तिस-या आठवड्यात तर दहावीचा निकाल शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जाईल. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी राज्यात दहावी-बारावीचे निकाल जाहीर झालेले असतील. निकाल लवकर जाहीर झाल्याने अकरावी, डिप्लोमा, आयटीआय आणि विविध प्रकारच्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला गती मिळणार आहे.
राज्य मंडळाकडून दोन्ही परीक्षांचा निकाल १० जूनपर्यंत जाहीर केला जातो. मात्र, मंडळातील कार्यक्षम अधिका-यांमुळे या दोन्ही परीक्षांचे निकाल लवकर प्रसिद्ध करण्याकडे कल आहे. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्चदरम्यान, दहावीची परीक्षा १ ते २६ मार्च या दरम्यान घेण्यात आली. बारावीच्या परीक्षेला साधारण १४ लाख विद्यार्थी बसले होते. त्याचप्रमाणे दहावीच्या परीक्षेला १६ लाख विद्यार्थी बसले होते.