पंढरपूर/माळशिरस : देवदर्शन करून परतीच्या प्रवासाला निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला. म्हसवड-पंढरपूर मार्गावरील तांदुळवाडी गावाजवळ रविवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात वाहन रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळल्याने आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर सहा जणांना जीवदान मिळाले आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण पंढरपूर तालुका आणि परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अधिक महिन्यानिमित्त म्हसवड येथील सिद्धनाथाचे दर्शन घेऊन भाविकांचा समूह पंढरपूरकडे परतत होता. यावेळी तांदुळवाडी गावाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एमएच १३ डी क्यू ६३३६ क्रमांकाचे छोटा हाती वाहन थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत कोसळले. अपघात इतका भीषण होता की वाहनातील प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही.
आठ जणांचा जागीच मृत्यू
या दुर्घटनेत इंदुबाई बावचे (६०), पूजा सातोरे (२३), पूजा बावचे (२७), आश्विनी बावचे (२७), संस्कार बावचे (१४), संस्कृती बावचे (१४), आरव सातोरे (८) आणि समर्थ बावचे (६ महिने) यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला, लहान मुले आणि एका सहा महिन्यांच्या बालकाचाही समावेश असल्याने या घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले आहे.तर शशिकला जाधव, सागर चौगुले (रा. रांजणी), संदीप बावचे, बालाजी बावचे, जिया बावचे आणि आरव बावचे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बचावकार्यासाठी प्रशासनाची धावपळ
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली आणि बचावकार्यासाठी मदतीचा हात पुढे केला. पोलिस, महसूल विभाग, अग्निशमन दल आणि जिल्हा प्रशासनाची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. विहिरीतील पाण्याची खोली आणि अंधारामुळे बचावकार्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.सायंकाळी सात वाजेपर्यंत आठ मृतदेह बाहेर काढण्यात यश आले होते, तर जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पंढरपूर येथे पाठविण्यात आले आहेत.
अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट
प्राथमिक माहितीनुसार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात असला, तरी नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अपघातस्थळावरील विहीर रस्त्याच्या वळणावर असून ती पूर्णपणे पाण्याने भरलेली होती. विहिरीला संरक्षक कठडा होता की नाही, याचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे.
लोकप्रतिनिधींची घटनास्थळी भेट
अपघाताची माहिती मिळताच माजी आमदार रामभाऊ सातपुते, सांगोल्याचे आमदार बाळासाहेब देशमुख आणि माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. प्रशासनाकडून मदतकार्य आणि चौकशीची माहिती त्यांनी घेतली.
“घटना अत्यंत दुर्दैवी” – पालकमंत्री जयकुमार गोरे
या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी संबंधित यंत्रणांकडून सविस्तर माहिती घेत असल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले की, “आठ जणांचा मृत्यू होणे अत्यंत दुर्दैवी आहे. विहिरीला कठडा होता की नाही, याची चौकशी केली जाईल. रस्त्यालगतच्या विहिरींना सुरक्षेची आवश्यक व्यवस्था असणे बंधनकारक आहे. या प्रकरणात कोणी निष्काळजीपणा केला असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल.” या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रशासनाकडून घटनेच्या सर्व पैलूंची चौकशी सुरू करण्यात आली असून अपघातामागील नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
















