संगमनेर : कीर्तनातून लग्नातील अनावश्यक खर्चावर टीका करणारे महाराज स्वत:च्या मुलीच्या साखरपुड्यावर लाखोंची उधळपट्टी करत असल्याचा गंभीर आरोप मुंबई डबेवाला संघटनेच्या अध्यक्षांनी केला.
या सगळ्या वादावर इंदुरीकर महाराज स्पष्टीकरण देत म्हणाले, मुलीच्या साखरपुड्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या खर्चामुळे टीका होत असली तरी आलेल्या मान्यवरांचा सत्कार सोहळा टाळला असून वीस वर्षे लोकांनी नावे ठेवली तेच सहन करत आलो असल्याची खंत व्यक्त केली.
कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरीचा साखरपुडा नुकताच संगमनेर येथील ‘वसंत लॉन्स’ येथे मोठ्या थाटामाटात पार पडला. या सोहळ्याला काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मात्र शाही सोहळ्यातील खर्चावरून इंदुरीकर महाराजांवर तीव्र टीका सुरू झाली आहे.
मात्र इंदुरीकर महाराज यांना अशा प्रकारची टीका होणार हे माहिती असल्याने त्यांनी कार्यक्रमात याबाबत स्पष्टीकरण दिले. वीस वर्षे लोकांनी नावे ठेवली तेच सहन करत आलो. पण आता इथून पुढे विशिष्ट व्यक्तीचा सत्कार करायचा नाही असा बदल करायचा ठरवला आहे. करायचा तर सगळ्यांचा नाहीतर एकाचाही नाही. १ लाख ११ हजारांची मदत नुकसानग्रस्त शेतक-यांसाठी दिली. जेवण महाराष्ट्रीयन पद्धतीने ठेवले. कार्यक्रमात जेवण वाढवणारे वारकरी वेशात होते. जेवण महाराष्ट्रीन होतं, चायनीज नव्हतं, व्याही भेटीचा कार्यक्रम बंद केला.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे खुर्ची नाही. फक्त ज्याला आजार आहे त्यानेच खुर्चीवर बसायचे. वारकरी संप्रदायाने जगाला एकात्मता आणि संघटन कौशल्य शिकवले. मी शेतक-याचा मुलगा आहे आणि लोकांच्या आशीर्वादाने इथपर्यंत पोहोचलो, असे स्पष्टीकरण इंदुरीकर महाराजांनी दिले. व्याही भेट हा कार्यक्रम देखील बंद करून टाकला आहे. तुम्हाला नावं ठेवायची तर ठेवा पण आपल्या माणसांसाठी ही काळाची गरज आहे, असेही इंदुरीकर महाराज म्हणाले.
















