दुबई : ओमानच्या किना-याजवळ अडकलेल्या भारतीय ध्वजांकित विराट-१ या व्यापारी जहाजावरील १४ पैकी ११ भारतीय खलाशांची सुटका सुरू असल्याची माहिती मस्कतमधील भारतीय दूतावासाने दिली. सुरुवातीला या घटनेबाबत फारशी माहिती देण्यात आली नव्हती. मात्र नंतर जहाजाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे ही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले.
दूतावासाने सोशल मीडियावरील निवेदनात जहाजाचे इंजिन निकामी झाल्यानंतर ११ खलाशांना सुरक्षितपणे लाइफ राफ्ट (जीवरक्षक तराफा) मध्ये स्थलांतर केले. त्यानंतर त्यांना एमव्ही जबल अली-९ या जहाजावर सुरक्षित पोहोचवण्यात आले आहे. ओमानी अधिका-यांच्या समन्वयाने बचाव मोहीम हाती घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. आखाती प्रदेशात सध्या तणावपूर्ण वातावरण असताना ही घटना घडली आहे.
सध्या ओमानमधील दक्म बंदरात उभ्या असलेल्या एका जहाजावरील भारतीय नागरिक निशांत उर्थनाथन यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मस्कतमधील भारतीय दूतावासाने दिली. या नागरिकाचा मृतदेह भारतात आणण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या नागरिकाचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणाने झाला याची माहिती दूतावासाने दिलेली नाही. दूतावासाने निशांत यांच्या कुटुंबीयांशी, जहाजावरील कर्मचा-यांशी आणि संबंधित अधिका-यांशी आपण संपर्कात असल्याचे सांगितले. निशांत हे एमटी सेलेस्टियल या जहाजावर कार्यरत होते आणि त्यांचा वैद्यकीय गुंतागुंतीमुळे मृत्यू झाला. दूतावासाने शोकाकुल कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या असून जहाज व्यवस्थापन कंपनीशी सातत्याने संपर्क ठेवला असल्याचे सांगितले.
इस्रायलचे बैरुतवर हवाई हल्ले सुरूच
इस्रायलच्या हवाई दलाने रविवारी लेबनॉनची राजधानी बैरुतच्या उपनगरांवर हल्ले केल्याचे सांगितले असून हे हल्ले हिजबुल्लाहच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करून करण्यात आले आहेत. या कारवाईदरम्यान शहरावर धुराचे लोट उठताना दिसल्याचे वृत्त आहे. हे हल्ले अशावेळी झाले आहेत जेव्हा अमेरिका व इराण यांच्यात युद्धविराम आणि संभाव्य कराराबाबत चर्चा सुरू आहे. हा करार इस्रायलसाठी अपेक्षेपेक्षा कमी समाधानकारक असल्याचेही म्हटले जात आहे. हे हल्ले उत्तर इस्रायलवर हिजबुल्लाहने केलेल्या रॉकेट हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात करण्यात आल्याचे इस्रायलने सांगितले.
















