नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी मंगळवार दि. १६ जून रोजी दिल्ली-एनसीआर भागात सक्रिय असलेल्या आणि पाकिस्तानचा पाठिंबा असलेल्या एका दहशतवादी-गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश केला. या कारवाईत सीमेपलीकडून शस्त्रे आणि अंमली पदार्थांची तस्करी केल्याचा आरोप असलेल्या ७ जणांना अटक करण्यात आली आहे.
ही टोळी पाकिस्तानात असलेले आणि गँगस्टरमधून दहशतवादी बनलेले शाहझाद भट्टी आणि अजमल गुज्जर यांच्याद्वारे चालवली जात होती. त्यांच्यावर पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयचा वरदहस्त असल्याचे मानले जाते. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे आरोपी पंजाब सीमेवर ड्रोनद्वारे पाडण्यात आलेली बेकायदेशीर शस्त्रे, दारूगोळा आणि अंमली पदार्थ मिळवून ते दिल्ली-एनसीआरमध्ये पुरवण्याचे काम करत होते.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी ५ अत्याधुनिक सेमी-ऑटोमॅटिक पिस्तूल, ४१ जिवंत काडतुसे, ७ मोबाईल फोन (ज्यामध्ये भट्टी आणि गुज्जर यांच्याशी संबंधित संशयास्पद चॅट्स आणि व्हॉईस नोट्स आहेत), १ एसयूव्ही कार आणि अंमली पदार्थ, तसेच बेकायदेशीर शस्त्रांच्या विक्रीतून मिळालेला पैसा हस्तांतरित करण्यासाठी वापरण्यात आलेल्या अनेक बँक खात्यांची माहितीही पोलिसांनी जप्त केली आहे.
अटक करण्यात आलेले आरोपींची नावे
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अनस त्यागी, मोहित ऊर्फ योगी, दीपक ग्रोला, आरिफ ऊर्फ प्रधान, जतन आणि साबीर (सर्व राहणार गाझियाबाद) आणि करणवीर सिंग(राहणार पंजाब)अशी आहेत. हे सर्व २६ ते ३८ वर्षे वयोगटातील असून त्यांच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, तसेच आर्म्स अॅक्ट (शस्त्र कायदा) आणि एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सोशल मीडियाद्वारे तरुणांची भरती
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्यात मिळालेल्या गुप्तचर माहितीवरून असे समोर आले होते की, भट्टी आणि गुज्जर हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे तरुणांना झटपट पैसा आणि गुन्हेगारी जगतातील ग्लॅमरचे आमिष दाखवून दिल्ली-एनसीआरमध्ये हल्ले घडवून आणण्याचा कट रचत होते. या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सर्वात आधी मोहित ऊर्फ योगी याला अटक केली. त्याच्याकडून बेकायदेशीर शस्त्रे आणि पाकिस्तानातील हँडलर्सच्या संपर्कात असल्याचे पुरावे जप्त करण्यात आले होते.
पोलिसांनी दहशतवादी हल्ल्यांचा कट उधळला
तपासादरम्यान, या टोळीच्या सदस्यांनी दिल्ली-एनसीआरमधील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांची आणि गर्दीच्या भागांची रेकी केली होती. या ठिकाणांचे फोटो आणि व्हीडीओ पाकिस्तानातील हँडलर्सना पाठवले जात होते, अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी सांगितले की, वेळेत केलेल्या कारवाईमुळे राष्ट्रीय राजधानीत होणारे अनेक नियोजित दहशतवादी हल्ले उधळवून लावण्यात यश आले आहे.
















