पुणे : पुण्याच्या लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगला गेलेल्या केतन अग्रवालचा पाय घसरून दरीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना १८ जून रोजी घडली होती. सुरुवातीला हा निव्वळ एक अपघात वाटत असतानाच आता पुणे पोलिसांच्या तपासात एक अत्यंत खळबळजनक आणि थरारक खुलासा झाला आहे. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवालची अपघात दाखवून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे.
ज्या घरात लग्नाचे सनई चौघडे वाजणार होते, त्या घरात आज स्मशान शांतता पसरली आहे. ज्या घरात मंडळी वऱ्हाडी म्हणून येणार होती, तीच मंडळी आता सांत्वन करण्यासाठी येत आहेत. सिया गोयलशी लग्न करून सुखी संसाराचे स्वप्न केतनने पाहिले होते, पण तिनेच त्याचा घात केला. या हत्येत सियाला तिचा प्रियकर चेतन चौधरी याने साथ दिली. या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल असा हा संपूर्ण कट असल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे.
एकीकडे केतन अग्रवाल यांच्या कुटुंबीयांनी अनेक खळबळजनक आरोप केले असताना, पोलीस कोठडीत असलेली मुख्य आरोपी सिया गोयलचे वर्तन खूपच हट्टी स्वरूपाचे दिसत आहे. ती चौकशीला सहकार्य करत नसून अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर थेट मौन बाळगत आहे. पोलीस जेव्हा तिला प्रश्न विचारतात, तेव्हा ती काही प्रश्नांची उत्तरे देत नाही, मात्र तिने या भयानक कटाचा मुख्य सूत्रधार स्वतःच असल्याचे कबूल केले आहे.
चौकशीत सियाने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, केतनला संपवण्यासाठी तिने आणि चेतनने एक सांकेतिक भाषा ठरवली होती. तिने चेतनला सांगितले होते की, जेव्हा आपण किल्ल्यावर असू तेव्हा मी खाली वाकेन, तेव्हा तू समजून जायचे की केतनला धक्का देण्याची हीच ती वेळ आहे. ठरल्याप्रमाणे, हत्येच्या दिवशी म्हणजेच १८ जून रोजी जेव्हा हे तिघेही लोहगड किल्ल्यावर पोहोचले आणि चेतन या दोघांच्या अगदी जवळ आला, तेव्हा सिया अचानक खाली वाकली. हाच इशारा समजून चेतनने ठरलेल्या कटानुसार केतनला दरीत धक्का दिला.
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सियाचे केवळ १० वी पर्यंत शिक्षण पूर्ण झाले असून ती १२ वी नापास आहे. तिला दारूसह इतर वाईट सवयी असल्यामुळे तिचे आई-वडील प्रचंड त्रस्त होते. सियाचे यापूर्वीही अनेक बॉयफ्रेंड राहिले होते. आपली मुलगी हाताबाहेर गेली आहे हे समजल्यामुळे तिचे लग्न लावून तिचे आयुष्य स्थिर करण्याचा तिच्या पालकांचा प्रयत्न होता.
पालकांनी तिच्यासाठी केतनची निवड केली होती. केतन हा चांगल्या घरातील, सुशिक्षित मुलगा होता आणि त्यांची आर्थिक परिस्थितीही खूप चांगली होती. त्यामुळे सियाने केतनसोबत लग्न करावे यासाठी तिच्या पालकांचा दबाव होता. केतनला नकार देता येईल असे कोणतेही कारण सियाकडे नव्हते, म्हणूनच तिने केतनला कायमचे संपवण्याचा हा जीवघेणा कट रचला.
















