४८ तासांत धो-धो पाऊस, हवामान खात्याचा अंदाज
मुंबई : प्रतिनिधी
राज्यभरात जवळपास २० दिवस उशिरा आलेल्या पावसाने यंदा आगमनाची चांगलीच वाट पाहायला लावली. दरवर्षी साधारण ४ जूनदरम्यान कोकण किनारपट्टीवर दाखल होणारा मान्सून यंदा सोलापूरच्या हर्णे भागातच अडखळला. त्यात प्रशांत महासागरातील एल निनोच्या प्रगतीमुळे नैऋत्य मोसमी वा-यांची वाट खडतर झाली होती. त्यानंतर आता मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात सक्रीय झाला आहे. काही दिवसांत पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता असून हवामान विभागाने २७ जुलैदरम्यान महाराष्ट्रासाठी इशारा दिला आहे.
दरम्यान, कोकण किनारपट्टीसह संपूर्ण मुंबईनगरीत पहिल्याच दिवशी पावसाने तुफान हजेरी लावली. पुण्यासह मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत पावसाचा जोर वाढत आहे. आता नैऋत्य मान्सूनची प्रगती वेगाने सुरू असून २३ जून रोजी मान्सून मध्य अरबी समुद्रातील उर्वरित भाग, महाराष्ट्रातील मुंबईसह आणखी काही भाग, तसेच तेलंगणा आणि ओडिशामधील उर्वरित भागांत सरकला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून उत्तर अरबी समुद्राच्या काही भागांत, गुजरात, महाराष्ट्रातील आणखी काही भागांत तसेच छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील काही भागांत पुढे सरकण्याची शक्यता आहे. पश्चिमेकडील वारे सुमारे १.५ किलोमीटर उंचीपर्यंत अधिक मजबूत झाले असून उत्तर सोमालिया किनारपट्टीलगत कमी दाबाचा जेट प्रवाह सक्रिय आहे. यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यातही
जोरदार पाऊस!
उत्तर कोकणात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता असून काही ठिकाणी जोरदार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत बहुतांश ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील काही भागांतही जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच वादळी वा-यासह पाऊस कोसळू शकतो.
















