परभणी : प्रतिनिधी
परभणीच्या मतदारांनी महाविकास आघाडीला व उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराला खासदार म्हणून निवडून दिले होते. मात्र, आज त्यांनी गद्दारी केली. यामुळे मी मतदारांची क्षमा मागण्यासाठी आलो. तसेच परभणीकरांनी महापालिकेवर आमची सत्ता आणली, त्या मतदारांना धन्यवादही द्यायला आलो. मागील अनेक वर्षांपासून परभणीला फुटीची आणि गद्दारीची पार्श्वभूमी असल्याचे पहावयास मिळाले. मात्र, येथील मतदार कायम शिवसेनेसोबत असल्याचा अभिमान देखील वाटतो असे मत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मराठवाडा दौ-यावर आले असून शनिवारी रात्री त्यांचे परभणी जिल्ह्यात आगमन झाले. रविवारी सकाळी त्यांनी पत्र परिषदेतून भूमिका मांडली. याप्रसंगी खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे, महापौर सय्यद इकबाल यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. उद्धव ठाकरे म्हणाले, मुळात गद्दारीच्या मुळावर घाव घातला पाहिजे. याशिवाय महाराष्ट्र व देश वाचणार नाही. हे ‘ऑपरेशन टायगर’ नाही तर ‘ऑपरेशन देवेंद्र’ असल्याचेही दिसून येते.
उद्धव ठाकरे खासदारांच्या गद्दारीवर म्हणाले, या सर्व मतदारसंघांत लक्ष दिले असते तर गद्दारांच्या भानगडी कळाल्या असत्या. आमच्या सोबत राहण्याची शपथ घेऊन सुद्धा ती शपथ मोडल्याचे दुष्परिणाम त्यांना दिसून येतील. खाजगी निधीसाठी खासदार तिकडे गेले. मिळालेला खासदार निधी कुठे खर्च केला, किती वेळेला लोकसभेत हजेरी लावली, मंत्र्यांना विकास कामासाठी भेटले, याचा अहवाल आमच्याकडे आहे.
सगळीकडे फुटाफुटी, जनतेकडे दुर्लक्ष
सध्याची परिस्थिती पाहता देशाच्या कोणत्याच राज्यात संतोष नाही. ‘नीट’चा पेपर फुटला, आता टीईटी पेपर फुटला, तिकडे खासदार फोडत आहेत, त्यामुळे सगळीकडे फक्त फुटाफुटी एवढेच आहे. जनतेच्या प्रश्नाकडे, शेतक-यांच्या कर्जमुक्तीकडे यांचे लक्ष नाही.
राम मंदिरातील चोरी म्हणजे हिंदुत्वाशी गद्दारी
राम मंदिर स्थापन व्हावे अशी सर्व हिंदूंची इच्छा होती. मात्र, भाजपने रामाच्या नावाने दुकान उघडले आहे. कार सेवकांचा संघर्ष देखील भाजपा विसरली. केवळ मंदिराच्या आडून घृणास्पद कामे केली जात आहेत. राम मंदिरातील चोरी म्हणजे एक प्रकारे हिंदुत्वाशी केलेली गद्दारी आहे.
कर्जमाफीतून केवळ देखावा
माझ्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात चांगले काम केले. ते अनेकांना खुपले. शेतक-यांच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही. त्यामुळे मी माझ्या कार्यकाळात कर्जमुक्तीची घोषणा केली होती. मात्र, या सरकारने कर्जमाफीची घोषणा केली ती सुद्धा जाचक अटी आणि शर्थीवर. हाच शब्दातील फरक आहे. त्यामुळे या कर्जमाफीतून केवळ सरकार देखावा करीत आहे.
गद्दारीच्या मुळावरच घाव घालावा लागणार
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, बंडू जाधव यांच्यासारख्या लोकांकडे जर आम्ही आधीच लक्ष दिले असते, तर त्यांच्या अनेक भानगडी आम्ही केव्हाच बाहेर काढल्या असत्या. आता केवळ वरवर बोलून चालणार नाही, तर गद्दारीच्या मुळावरच घाव घालावा लागणार आहे. मुंबईत गद्दारांचे शिरोमणी बसले आहेत. शिंदे सेनेच्या सर्व उमेदवारांना जनतेने निवडणुकीत ठरवून पाडले पाहिजे. जर या गद्दारांना आताच चिरडले नाही, तर हा देश वाचणार नाही.
मतदारांची मागितली क्षमा
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, परभणीकरांनी आमच्या पक्षाचा महापौर निवडून दिला, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. मी आज सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी आणि मतदारांची जाहीर क्षमा मागण्यासाठी येथे आलो आहे. कारण परभणी-हिंगोलीतील जनतेने महाविकास आघाडीच्या उमेदवारांना अत्यंत विश्वासाने मतदान केले होते, पण हे लोक आपल्याला सोडून गेले. या निवडून दिलेल्या खासदारांनी गद्दारी केली असली, तरी देखील सामान्य शिवसैनिक नेहमी आमच्यासोबतच राहतो, हा परभणी आणि हिंगोलीचा इतिहास आहे.
















