मुंबई : प्रतिनिधी
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बहुचर्चित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प पुन्हा वादाच्या भोव-यात सापडला आहे. काही दिवसांपूर्वी नव्या मार्गावर खड्डे पडल्याची चर्चा सुरू असतानाच, सोमवारी पहाटे ‘मिसिंग लिंक’च्या एन्ट्री पॉईंटजवळ स्लॅबचा काही भाग कोसळला.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंकच्या क्षेत्रात मुंबईच्या दिशेने जाणा-या मार्गावर ही दुर्घटना घडली. येथील ८.९ किलोमीटर लांबीच्या बोगद्याच्या अगदी शेवटी डोंगराचा प्रचंड मोठा भाग कोसळला. दरडीसोबतच तिथला एक भलामोठा सिमेंटचा पिलर थेट मुख्य रस्त्यावर आडवा झाला आहे. सुदैवाने यात जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप नाही, मात्र वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या घटनेनंतर विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
रोहित पवारांचा सरकारवर निशाणा
या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, खड्डे पडले तेव्हा ड्युरॅबिलिटी टेस्ट सांगितली, आता स्लॅब कोसळणंही त्याच टेस्टचा भाग आहे का? मिसिंग लिंकच्या कामात दलाली आणि भ्रष्टाचाराची लिंक झाली असून सुरक्षाच मिसिंग झाली आहे, असा आरोप केला.
अख्खा मिसिंग लिंकच कोसळला : संजय राऊत
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या दुर्घटनेवरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत सडकून टीका केली आहे. मुख्यमंत्री म्हणतात मिसिंग लिंकवर दोन खड्डे पडलेत, पण आज त्यांनी स्वत: जाऊन पाहावे; खड्डे सोडून द्या, तिथे अख्खा मिसिंग लिंकच कोसळला आहे, अशा शब्दांत राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले.
- ‘ही नेमकी कसली टेस्ट?’
वर्षा गायकवाड यांचा सवाल
काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. या घटनेमुळे मुंबई-पुणे मार्गावरील रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झाल्याचे सांगत, खड्ड्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘टेस्टिंग’चे स्पष्टीकरण दिले होते, आता हा नेमका कसला टेस्ट आहे? हा महाराष्ट्रातील जनतेच्या संयमाचा कस पाहण्याचा प्रयत्न आहे का, असा सवाल त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे उपस्थित केला. - तर कोणते टेस्टिंग सुरू आहे? : विजय वडेट्टीवार
अवघ्या दोन महिन्यांपूर्वी उद्घाटन झालेल्या प्रकल्पावरच दरड कोसळत असल्याने कामाच्या दर्जा आणि नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले. ‘मिसिंग लिंकवर खड्डे पडल्यावर सरकारने ते टेस्टिंग असल्याचे सांगितले होते, आता दरड कोसळली तर कोणते टेस्टिंग सुरू आहे?’असा सवाल त्यांनी केला. प्रवाशांकडून नियमित टोल वसूल केला जातो, मात्र सुरक्षित प्रवासाची हमी देण्यात सरकार अपयशी ठरत असल्याची टीका करत, या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.
















