नवी दिल्ली/हैदराबाद : सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी तरुणांचा कॉकरोच असा उल्लेख केल्यानंतर देशात कॉकरोच जनता पार्टी नवाचे आंदोलन उभे राहिले. याच आंदोलनामुळे नंतर धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता कॉकरोच जनता पार्टी देशभरात काम करणार आहे. दरम्यान, सरन्यायाधीशांनी कॉकरोचचा उल्लेख केल्यापासून ते चर्चेत आहेत. दिल्लीच्या आंदोलनात पोलिसांनी केलेल्या मारहाणीचे व्हीडीओ पाहण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही, असे सांगत पोलिसांच्या कारवाईवर तत्काळ सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला होता. यावरून देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये सरन्यायाधीशांविरोधात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, आता हेच सरन्यायाधीश एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहेत. हैदराबादमधील नालसार विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या हातातून पदवी स्वीकारण्यास नकार दिला आहे. विद्यार्थ्यांनी दीक्षांत समारंभाच्या कार्यक्रमालाच विरोध केला आहे. हैदराबाद येथील नॅशनल अकॅडमी ऑफ लीगल स्टडिज अँड रिसर्च विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभावरून मोठा वाद सुरू झाला आहे. या दीक्षांत समारंभाला सरन्यायाधीश सूर्यकांत यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. सरन्यायाधीशांच्याच हस्ते विद्यार्थ्यांना पदवी देण्यात येणार आहे. या पत्रात देशात गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांना प्रमुख पाहुणे आमंत्रित करण्याचा निर्णय संवैधानिक जबाबदारी आणि शैक्षणिक स्वातंत्र्याच्या मूल्यांविरोधात आहे असेही मत या पत्रात व्यक्त करण्यात आले आहे.
सूर्यकांत यांच्या हस्ते पदवी घेण्यास नकार
२०२६ साली पदवी उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांच्या एका गटाने सूर्यकांत यांच्या हस्ते पदवी घेण्यास नकार दिला आहे. या विद्यार्थ्यांनी कुलगुरू, कुलसचिव तसेच प्राध्यापकांना एक पत्र लिहिले आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्याबाबत पुनर्विचार करावा, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.
दीक्षांत समारंभ पुढे ढकलला
सुमारे दोन आठवड्यांपूर्वी, मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसने २ ऑगस्ट रोजी होणारा आपला ८६ वा दीक्षांत समारंभ अवघ्या दोन दिवस आधी पुढे ढकलला होता. संभाव्य आंदोलनांमुळे कार्यक्रमात अडथळा निर्माण होऊ शकतो, अशा सुरक्षाविषयक चिंतेमुळे हा ऐनवेळचा निर्णय घेण्यात आला. या समारंभाला भारताचे सरन्यायाधीश सूर्य कांत मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार होते. ‘टिस’ने विद्यार्थ्यांना पाठवलेल्या निवेदनात अपरिहार्य परिस्थितीत हा समारंभ पुढे ढकलण्याचे कारण सांगितले होते. संस्थेने अधिकृतपणे या निर्णयाचा सरन्यायाधीशांच्या दौ-याशी किंवा संभाव्य आंदोलनांशी कोणताही संबंध जोडलेला नाही. या निर्णयामुळे पदवीधर विद्यार्थी, विशेषत: ज्यांनी प्रवासाची आणि राहण्याची व्यवस्था केली होती, ते नाराज झाले आहेत.
















