छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
गेल्या काही महिन्यांपासून देशात होणा-या परीक्षांबाबत धक्कादायक खुलासे होत आहेत. नीट पेपरफुटीनंतर महाराष्ट्रात टीईटी परीक्षेचा पेपर फुटला. पेपरफुटीमुळे विद्यार्थी, पालक त्रस्त असताना आता तर थेट बोगस परीक्षेचा प्रकार उघडकीस आल्याने सर्वत्र खळबळ उडाली. नोकरीचे आमिष दाखवून परीक्षेच्या नावाखाली हजारो विद्यार्थ्यांकडून पैसे उकळत मोठी फसवणूक झाल्याचा प्रकार आज छ. संभाजीनगरमध्ये घडला. या बोगसगिरीमुळे विद्यार्थी, पालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, संतप्त तरुणांनी परीक्षा केंद्रावरच गोंधळ घातला. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
विमानतळावर आकर्षक नोकरी देण्याचे आमिष दाखवत एका खासगी कंपनीने महाराष्ट्रातील हजारो सुशिक्षित बेरोजगारांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला. शासकीय भरतीप्रमाणेच पारदर्शक प्रक्रिया असल्याचा देखावा निर्माण करून प्रत्येक विद्यार्थ्याकडून ५०० ते ७०० रुपयांची फी उकळण्यात आली. महिन्याला २५ हजार रुपयांचा पगार आणि विमानतळावरील झगमगीत नोकरीच्या आमिषाला बळी पडत राज्यभरातील शेकडो विद्यार्थी आज छत्रपती संभाजीनगरच्या उस्मानपुरा येथील एका शाळेत पोहोचले. पण येथे येताच आपली फसवणूक झाल्याचे परीक्षार्थ्यांनी सांगितले.
ऑनलाईन अर्ज भरून अभ्यासाची तयारी करून अनेक विद्यार्थी परीक्षेसाठी आले होते. परंतु विद्यार्थ्यांना खरी परिस्थिती लक्षात येताच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. कंपनीने सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन संगणकीय परीक्षा होणार असल्याचे सांगितले होते. मात्र, प्रत्यक्ष केंद्रावर एकही संगणक उपलब्ध नव्हता. अधिक विचारणा केली असता परीक्षा घेण्यासाठी आलेली कथित थर्ड पार्टी कंपनीही हात वर करत आम्हाला काहीच माहिती नाही, असे सांगत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस देखील दाखल झाले असून विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
डीजीसीएची परवानगी नाही, आयबीपीएसचाही गैरवापर
एनआयए एव्हिएशन सर्व्हिसेस प्रा. लि. कडून ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र परीक्षा घेण्यासाठी आवश्यक डीजीसीएची परवानगी आणि अधिकृत कागदपत्रे दाखवण्यात आली नसल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. परीक्षेच्या नोटिफिकेशनवर आयबीपीएसचेच् नाव असल्याने विद्यार्थ्यांनी आयबीपीएसच्या नावाच्या गैरवापराबाबतही प्रश्न उपस्थित केले आहेत.
थर्ड पार्टी म्हणून परीक्षेचे आयोजन
परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी प्रत्येकी ६०० रुपये भरले होते. परंतु जेव्हा परीक्षार्थी परीक्षेला आले, त्यावेळी केंद्रावर सीट नंबर, चेकिंग कर्मचारी आणि आवश्यक व्यवस्था नव्हती. त्यातच एनआयए एव्हिएशन सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनी केवळ थर्ड पार्टी म्हणून परीक्षा घेत असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. परीक्षार्थ्यांच्या गोंधळानंतर पोलिस दाखल झाले आणि त्यानंतर परीक्षा घेण्यात आली.
परीक्षा घेणारी कंपनी बोगस!
एनआय एव्हिएशन सर्व्हिसेस प्रा. लि. ही परीक्षा घेणारी कंपनी बोगस आहे. सीएसए ग्राउंड स्टाफची परीक्षा होती. त्यामुळे डीजीसीएचे लेटर पाहिजे होते. परंतु यांच्याकडे ते नव्हते. सीटू कंपनीकडेही एनआयएचे लेटर नाही. नोटिफिकेशनवर आयबीपीएसचे नाव आहे. यांनी आयबीपीएसचाही गैरवापर केला, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला. जानेवारी महिन्यात जाहिरात निघाली होती.
















