सुप्रीम कोर्टाचे वॉरंट, डिजिटल अरेस्टच्या नावाखाली लूट
मुंबई : प्रतिनिधी
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली नागरिकांना भीती दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणा-या एका मोठ्या आंतरराज्यीय टोळीचा मुंबई पोलिसांच्या पश्चिम विभाग सायबर गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. देशातील विविध राज्यांत एकाच वेळी विशेष मोहिमेअंतर्गत धाडी टाकत पोलिसांनी या टोळीतील ७ सराईत आरोपींना बेड्या ठोकल्या. या टोळीने एका नागरिकाला डिजिटल अरेस्टची भीती दाखवून १ कोटी ६७ लाख ४० हजार रुपयांचा गंडा घातला होता.
आरोपींनी फिर्यादीशी संपर्क साधून त्यांच्या आधार कार्ड आणि पॅन कार्डचा वापर एका मोठ्या मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात झाल्याचा बनाव रचला. तुमच्या बँक खात्यांची तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे आणि तुमच्या विरोधात सुप्रीम कोर्टातून अटक वॉरंट निघाले आहे, अशी भीती त्यांना घालण्यात आली. अटक आणि कायदेशीर कारवाईच्या दहशतीखाली आरोपींनी फिर्यादीला तब्बल १ कोटी ६७ लाख रुपये त्यांच्या विविध बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडिताने मुंबई सायबर पोलिसांत धाव घेतली.
विविध राज्यांत
एकाच वेळी धाडी
गुन्हा दाखल होताच मुंबई सायबर गुन्हे शाखेने तांत्रिक तपासाच्या आधारे देशातील विविध राज्यांमध्ये एकाच वेळी छापेमारी करत ७ आरोपींना अटक केली. या आरोपींमध्ये संजय शाह, ऋषी रामचंद्र मीना, नौशाद अली, मोहम्मद खालीद सैफी, जगेश्वर महतो, जाबीर हुसेन आणि एका महिलेची समावेश आहे.
२७ मोबाईल,
६१३ सिमकार्ड जप्त
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले मोठे साहित्य जप्त करण्यात आले. यात २७ मोबाईल, २ लॅपटॉप, ५ डिजिटल सही साधने, ६१३ सीमकार्ड, १० चेकबुक, २ पासबुक आणि २ एटीएम कार्ड आदी साहित्य जप्त करण्यात आले.
खात्यातीर रक्कम गोठविली
आरोपींचे विविध बँक खात्यांमधील ३४ लाख रुपये पोलिसांनी तातडीने गोठवले. आरोपींनी डिजिटल अरेस्टची भीती दाखवून देशात आणखी कोणाची फसवणूक केली आहे का? याचा सखोल तपास मुंबई पोलिस करत आहेत.
















