राज्यात २१.१४ टक्के नावांचा यादीत समावेश नाही
मुंबई : प्रतिनिधी
राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ‘विशेष सखोल पुनरीक्षण २०२६’ अंतर्गत राज्याची नवी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, या यादीतून राज्यातील तब्बल २ कोटींपेक्षा जास्त मतदारांची नावे वगळण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
सखोल पुनरीक्षणाची ही प्रक्रिया राबवण्यापूर्वी राज्यात एकूण ९,७८,५४,०४९ नोंदणीकृत मतदार होते. परंतु नव्याने प्रसिद्ध झालेल्या मसुद्यात ७,७१,६५,५६२ (७८.८६ टक्के) मतदारांचाच समावेश करण्यात आला आहे. म्हणजेच गणना प्रपत्र न मिळाल्याने, गैरहजर असणे, स्थलांतर, मृत्यू किंवा दुबार नोंदणीमुळे तब्बल २,०६,८८,४८७ (२१.१४ टक्के) मतदारांची नावे सध्याच्या यादीत समाविष्ट झालेली नाहीत. या नव्या प्रारुप यादीत पुरुष मतदारांची संख्या ३,९५,८९,९०५ इतकी आहे तर महिला मतदारांची संख्या ३,७५,७२,५७० एवढी नोंदवण्यात आली. याशिवाय ३,०८७ तृतीयपंथी मतदारांचा यादीत समावेश आहे.
यादीतील नावे तपासून घ्यावीत
मतदारांनी त्यांचे नाव निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या मसुद्यात आहे की नाही, हे तपासण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर भेट द्यावी. सीईओ महाराष्ट्र या लिंकवर जाऊन प्रारुप मतदार यादी २०२६ यावर आपले नाव तपासावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
३० सप्टेंबरपर्यंत दावे,
हरकती करता येणार
वगळण्यात आलेल्या किंवा नवीन नाव नोंदवू इच्छिणा-या नागरिकांसाठी निवडणूक आयोगाने महत्त्वाचे वेळापत्रक जाहीर केले. नागरिकांना आपले नाव तपासण्यासाठी आणि दावे व हरकती नोंदवण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२६ ते ३० सप्टेंबर २०२६ पर्यंतचा कालावधी देण्यात आला. यानंतर सर्व अर्जांची छाननी करून ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. १ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण करणारे नवमतदारही यासाठी पात्र ठरणार आहेत.
मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण
या पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान मतदान केंद्रांची पुनर्रचना आणि सुसूत्रीकरणही करण्यात आले. आधी राज्यात १,००,२५३ केंद्रे होती, त्यातील ४३१ केंद्रे कमी करून व ३९४ नवीन केंद्रे जोडून आता एकूण १,००,२१६ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली.
















