अमरावती : प्रहारचा उमेदवार आणि बच्चू कडू यांना कशाप्रकारे अडचणीत आणता यईल आणि त्यांना कशी अटक करता येईल, याचा सुनियोजित कट राणा दाम्पत्याकडून करण्यात आल्याचा आरोप मंगळवार दि. २३ एप्रिल रोजी बच्चू कडू यांनी सभेकरीता नियोजीत केलेल्या जागेवरून झालेल्या राड्यानंतर केला आहे.
याप्रकरणी दाद मागण्यासाठी आम्ही न्यायालयीन लढाई देखील लढू. मात्र आपला पराभव दिसत असल्याने अशाप्रकारे दडपशाही करण्याचा अयशस्वी प्रयत्न आज या निमित्ताने झाला आहे. यांचे परिणाम आता भोगावे लागतील, किंबहुना मतदार याचा हिशोब घेतल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही बच्चू कडू यांनी बोलून दाखवला आहे.
आता संपूर्ण महाराष्ट्राला या निमत्याने नवनीत राणांचा खरा चेहरा माहिती पडला आहे. त्यामुळे याचे उत्तर आता महाराष्ट्रातील जनता आपल्या मतदानातून दिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास मला जनतेवर असल्याचेही बच्चू कडू म्हणाले. आमच्या आंदोलनाच्या भूमिकेमुळे कुठलाही वाईट परिणाम होऊ नये, याचा विचार देखील आम्ही करत आहोत.
मात्र, देशाच्या गृहमंत्र्यांच्या सभेमध्ये जर कायदा पायदळी तुडविण्यात येत असेल, तर आमच्यासारख्याने न्याय कुणापुढे मागवा, हा मोठा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. काही वेळात या संबंधित सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून या संबंधित निर्णय घेऊ. ही एक प्रकारची तानाशाही असून याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभरात पडतील, असा इशाराही बच्चू कडू यांनी बोलताना दिला आहे.