मुंबई : आतापर्यंत १७ लाखांहून अधिक पात्र शेतक-यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून यादीत नाव आल्यावर पात्र शेतक-यांनी आधार प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक आहे. लवकरच शेतक-यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम हस्तांतरीत होणार आहे. गरजू आणि आर्थिक अडचणी सापडलेल्या शेतक-यांसाठी ही कर्जमाफी योजना आहे. त्यातून ९६ हजार करदात्या शेतक-यांना आणि इतर अपात्र अशा जवळपास दीड लाख शेतक-यांना कर्जमाफी योजनेतून बाद करण्यात आले आहे. त्यांच्या अकाऊंटमध्ये छदामही जमा होणार नाही. सध्या तांत्रिक अडचण दूर करण्याचे काम सुरू आहे. येत्या दोन दिवसांत पात्र शेतक-यांच्या खात्यात कर्जमाफीचा पैसा जमा होणार असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
शेतकरी कर्जमाफीची सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असतानाच तांत्रिक अडचणीने मोठा खोडा घातला. दोन दिवसांत शेतक-यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. पण ते हवेतच विरले. आता पुढील दोन दिवसांत पात्र शेतक-यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे. ही महत्त्वाची माहिती कृषि मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी यापूर्वी तांत्रिक अडचणीचा मुद्दा समोर आणला होता. ४ ऑगस्ट रोजीपासून कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरूवात होणार होती. पण अडथळा आल्याने शनिवारी अथवा रविवारी कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा होईल. राज्यातील ५६ लाख शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल.
आतापर्यंत १२ लाख शेतक-यांची ई-केवायसी पूर्ण
पहिल्या टप्प्यात कमी रक्कम तर दुस-या टप्प्यात मोठ्या शेतक-यांना कर्जमाफी देण्यात येणार आहे. युद्धपातळीवर ई-केवायसी प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत १२ लाख शेतक-यांचे ई-केवायसी पूर्ण झाले आहे. येत्या दोन दिवसांत शेतक-यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येईल असे दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. कर्जमाफीच्या तीन याद्या जाहीर होणार आहे. ज्यांची पहिल्या यादीत नावे आली नाहीत. त्या शेतक-यांनी संयम बाळगावा. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल टाकू नये असे आवाहनही भरणे यांनी केले.
तर खत विक्रेत्यांवर कारवाई
अनेक ठिकाणी युरियासोबत विनाअनुदानित खते शेतक-यांच्या माथी मारण्यात येत आहे. ती खरेदीची दुकानदार सक्ती करत आहेत. याविषयीच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या प्रकाराला आळा घालण्यासाठी सरकारने शासन परिपत्रक काढले आहे. असा प्रकार करणा-या विक्रेत्यांवर तात्काळ कडक कारवाईचे आश्वासन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहे.
पहिला हफ्ता वितरित : मुख्यमंत्री
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना घोषित केली होती. शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी आषाढीला जाहीर केली होती. कुठल्याही अर्जाविना आधार कार्डच्या सहाय्याने शेतक-यांची खाली रिक्त करायचे काम हाती घेतले होते. आज जवळपास ५ हजार २९ कोटी रूपयांचा पहिला हफ्ता ६ लाख २२ जार २०७ शेतक-यांच्या खात्यात गेला आहे. ही खाती रिक्त करण्यात आली आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
















