पुणे : प्रतिनिधी
राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत एफआरपीची चुकीची आकडेवारी साखर आयुक्त कार्यालयाला सादर करर्णाया,कारखान्यांवर तातडीने कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.थकीत ऊस बिलासह शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी शेट्टी यांनी राज्याचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
राज्यातील कारखान्यांनी सादर केलेली थकीत एफआरपीची आकडेवारी आणि प्रत्यक्ष स्थिती यामध्ये मोठी तफावत आहे असे नमूद करून ये म्हणाले. कारखानदार दिशाभूल करत असून आयुक्त कार्यालयाने याची गंभीर दखल घेऊन संबंधित कारखान्यांवर कारवाई करावी तसेच, राज्य सरकारच्या दोन किंवा तीन टप्यातील एफआरपीच्या धोरणामुळे गेल्या तीन वर्षांत ज्या कारखान्यांनी दोन ते तीन टप्प्यांत एफआरपी दिली, त्यांनी विलंबाच्या कालावधीचे व्याज शेतक-यांच्या खात्यावर तातडीने जमा करावे, उसाचे वजन आणि रिकव्हरी (उतारा) हा शेतक-यांसाठी चिंतेचा विषय आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून सर्व वजनकाटे तातडीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाईन जोडले जावेत, जेणेकरून काटामारीला आळा बसेल. कारखान्यांमध्ये रिकव्हरी चुकीची करण्याचे प्रमाण वाढले असून ते रोखण्यासाठी साखर आयुक्त कार्यालयाने तिथे स्वतंत्र तपासणी यंत्रणा उभारावी अशी मागणी करण्यात आली.
चालू गळीत हंगामात आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत बाजारपेठेत साखरेचे तसेच उपपदार्थांचे (बाय-प्रॉडक्ट्स) दर वाढले आहेत. कारखान्यांचा नफा वाढला असून, त्यांनी शेतक-यांना प्रतिटन ३०० रुपयांचा दुसरा हप्ता तातडीने द्यावा.देशात आणि राज्यात साखरेचा पुरेसा शिल्लक साठा उपलब्ध असल्यामुळे केंद्र सरकारने कोणत्याही परिस्थितीत साखर आयात करण्याचा निर्णय घेऊ नये असे स्पष्ट केले.
















