बीड : बीड शहरात एका हायप्रोफाइल विवाह सोहळ्यात केवळ बडेजाव दाखवण्यासाठी करण्यात आलेल्या बेजबाबदार आतिषबाजीमुळे एक मोठी आणि धक्कादायक दुर्घटना घडली आहे. लग्नघरातील अतिउत्साहापोटी स्टेजजवळ करण्यात आलेल्या फटाक्यांच्या भीषण स्फोटात चित्रीकरण करणारे फोटोग्राफर गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात जाळ आणि धूर एकाच वेळी पाहायला मिळाला असून लग्नसोहळ्याला गालबोट लागले आहे. या धक्कादायक प्रकारानंतर बीड जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनने अत्यंत तीव्र संताप व्यक्त केला आहे.
ही दुर्दैवी घटना बीड शहरातील आशीर्वाद मंगल कार्यालयात पार पडलेल्या एका शाही विवाह सोहळ्यात घडली. लग्नविधी सुरू असताना वधु-वरांच्या स्वागतासाठी आणि एन्ट्रीसाठी स्टेजच्या अगदी जवळ मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. मात्र, सुरक्षेच्या साध्या नियमांची पायामल्ली केल्यामुळे फटाक्यांचा एक मोठा दारुगोळा थेट स्टेजजवळ आपले काम करत उभे असलेल्या फोटोग्राफर्सच्या अंगावर येऊन फुटला. हा स्फोट इतका भीषण होता की क्षणार्धात तिथे आगीचे लोळ आणि धुराचे साम्राज्य पसरले.
या भयानक अपघातात पाच फोटोग्राफर्स जखमी झाले असून, त्यापैकी अभिषेक कदम नावाचे फोटोग्राफर सर्वाधिक गंभीर जखमी झाले आहेत. फटाका थेट तोंडावर आणि अंगावर फुटल्यामुळे अभिषेक यांच्या डोळ्यांसह चेहरा आणि शरीर मोठ्या प्रमाणावर भाजले आहे. तसेच इतर सहकाऱ्यांच्या कानाचे पडदे फाटल्याचीही माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेचे गांभीर्य अधिक वाढवणारी बाब म्हणजे, जखमी झालेल्या अभिषेक कदम यांचा स्वतःचा विवाह अवघ्या तीन दिवसांवर आला होता. ऐन स्वतःच्या लग्नाच्या तोंडावर ही दुर्घटना घडल्यामुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रकृती चिंताजनक असल्याने अभिषेक यांना तातडीने पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलवावे लागले. अत्यंत वेदनादायक बाब म्हणजे, तोंडाला बँडेज बांधलेल्या अवस्थेतच केवळ लग्नाचे विधी उरकण्यासाठी त्यांना विवाहस्थळी आणावे लागले.
या स्फोटात केवळ जीवितहानी टळली असली तरी आर्थिकदृष्ट्या फोटोग्राफर्सचे अतोनात नुकसान झाले आहे. फोटोग्राफीसाठी वापरले जाणारे लाखो रुपयांचे महागडे कॅमेरे आणि इतर अद्ययावत उपकरणे या आगीत जळून खाक झाली आहेत. लग्नकार्यात फोटोग्राफर्सच्या सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे आणि अक्षम्य निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप होत आहे.
या घटनेनंतर बीड जिल्हा फोटोग्राफर असोसिएशन कमालीची आक्रमक झाली असून त्यांनी आपला तीव्र निषेध नोंदवला आहे. असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आणि जखमींच्या कुटुंबीयांनी एकत्र येत बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची भेट घेतली आणि त्यांना एक कडक मागण्यांचे निवेदन सुपूर्द केले. लग्नकार्यात सर्रासपणे केल्या जाणाऱ्या अशा घातक आतिषबाजीवर तात्काळ बंदी घालण्यात यावी आणि दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी असोसिएशनने केली आहे. तसेच मंगल कार्यालयांमध्ये अंतर्गत किंवा गर्दीच्या ठिकाणी फटाके वाजवण्यास कडक मनाई असावी, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
केवळ क्षणिक मोठेपणा आणि बडेजाव दाखवण्यासाठी लोकांच्या आणि तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा प्रवृत्तींमुळे आज एका तरुणाचा आनंदाचा क्षण वेदनेने भरून गेला आहे. या घटनेनंतर आता बीडमधील लग्नकार्यांमध्ये फटाके वाजवण्याच्या नियमांबाबत प्रशासनाकडून काय पावले उचलली जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
















