नवी दिल्ली/ मुंबई : १२ ऑगस्ट रोजी वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण होणार आहे. हे सूर्यग्रहण अनेक अर्थांनी खास असणार आहे. कारण जगातील काही भागांमध्ये दिवसा आकाशात अंधार पसरलेला पाहायला मिळू शकतो आणि एक अद्भुत खगोलीय नजारा अनुभवता येणार आहे. मात्र, १२ ऑगस्टचे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही.
वर्ष २०२६ मधील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण होणार आहे. हे सूर्यग्रहण अनेक कारणांमुळे विशेष ठरणार आहे. असे सूर्यग्रहण पाहण्याची संधी तब्बल काही दशकांनंतर मिळत असल्याचे सांगितले जात आहे. हे ग्रहण पाहण्याची संधी हुकली, तर अशाच प्रकारच्या पुढील सूर्यग्रहणासाठी ६४ वर्षांपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते. वैज्ञानिकांच्या मते, काही भागांमध्ये ग्रहणाच्या वेळी असे वातावरण निर्माण होईल की, दिवसा अचानक रात्र झाल्यासारखे वाटेल. १२ ऑगस्ट रोजी लागणारे हे सूर्यग्रहण खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे. जसजसा चंद्र सूर्याच्या समोर येईल, तसतसा सूर्याचा मोठा भाग चंद्राच्या सावलीत झाकला जाईल. ग्रहण कळसाच्या जवळ पोहोचल्यावर आकाशातील प्रकाश मोठ्या प्रमाणात कमी होईल. चंद्र सूर्याचा सुमारे ९० टक्के भाग झाकेल. चंद्र सूर्याला झाकत जाईल, तसतसा प्रकाश कमी होत जाईल आणि काही काळासाठी अक्षरश: रात्र झाल्यासारखे दृश्य दिसेल.
यादरम्यान तापमानातही काही प्रमाणात घट जाणवू शकते आणि आजूबाजूचे वातावरण बदललेले दिसू शकते. मात्र, ही स्थिती काही काळापुरतीच असेल. ग्रहण संपल्यानंतर सूर्यप्रकाश पुन्हा दिसू लागेल आणि वातावरण हळूहळू पूर्ववत होईल.
कुठे-कुठे दिसणार सूर्यग्रहण?
या सूर्यग्रहणाचे सुंदर दृश्य युरोपातील काही भाग आणि उत्तर अटलांटिक क्षेत्रातून पाहता येणार आहे. ब्रिटन, स्पेन, आइसलँड आणि ग्रीनलँड या प्रमुख ठिकाणांचा त्यामध्ये समावेश आहे. १९९९ नंतर १२ ऑगस्ट २०२६ रोजी असे दूर्मिळ सूर्यग्रहण पाहायला मिळणार आहे. त्यानंतर अशाच प्रकारचे सूर्यग्रहण २३ ऑगस्ट २०९० रोजी दिसणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या दुर्मिळ खगोलीय घटनेचे साक्षीदार होणा-या लोकांसाठी हा अनुभव निश्चितच खास असणार आहे.
भारतातून सूर्यग्रहण दिसणार नाही
आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. भारतातील नागरिकांना हे अद्भुत दृश्य पाहता येणार नाही. याचे कारण म्हणजे भारतीय वेळेनुसार सूर्यग्रहण रात्रीच्या वेळी होणार आहे. त्यामुळे भारतातून सूर्यच दिसणार नसल्याने सूर्यग्रहणही पाहता येणार नाही. भारतीय वेळेनुसार सूर्यग्रहणाची सुरुवात रात्री ९ वाजून ४ मिनिटांनी होईल. पूर्ण ग्रहणाची सुरुवात रात्री १० वाजून २९ मिनिटांनी होईल. रात्री ११ वाजून १६ मिनिटांनी ग्रहण मध्यावस्थेत असेल. त्यानंतर ग्रहणाची समाप्ती १३ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे १ वाजून २७ मिनिटांनी होईल. या काळात भारतात रात्र असल्याने येथून सूर्यग्रहण दिसणार नाही.
भारतात सुतक काळ नाही
भारतामध्ये सूर्यग्रहण दिसणार नसल्यामुळे सुतक काळाबाबतही अनेकांच्या मनात प्रश्न आहे. धार्मिक मान्यतेनुसार, सुतक काळाचा संबंध ग्रहणाच्या दृश्यतेशी जोडला जातो. त्यामुळे १२ ऑगस्ट रोजी होणारे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नसल्याने, येथे सुतक काळ आणि त्यासंबंधित धार्मिक नियम लागू मानले जाणार नाहीत, असे मानले जाते.
















