32.8 C
Latur
Monday, May 13, 2024
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन जरांगेंनी सोडले उपोषण

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन जरांगेंनी सोडले उपोषण

नवी मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अविरत सुरू असलेल्या आंदोलनाला यश मिळाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटील यांनी ज्यूस पिऊन उपोषण सोडले. गेल्या दोन दिवसांपासून त्यांचे उपोषण सुरू होते.

अखेर वाशी येथील सभेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांनी ज्यूस पिऊन उपोषण सोडले. यावेळी गिरीश महाजन, दीपक केसरकर हेही उपस्थित होते . आज पहाटे सरकारने त्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्याचे सांगितल्यानंतर मराठा बांधवांनी एकच जल्लोष केला. त्यानंतर थोडा वेळ आराम केल्यानंतर मनोज जरांगे हे सभास्थळी निघाले. वाटेत हजारो मराठा बांधवांचे आशीर्वाद घेत मनोज जरांगेंचे पाऊल पुढे पडत होते.

सभेला सुरुवात करण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवरांनी शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर सभास्थळी येऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन जरांगे पाटलांनी उपोषण सोडले. मुख्यमंत्र्यांनी त्यांना गुलाल लावला, नवा जीआरही सुपुर्द केला.

प्रदीर्घ लढ्याला यश
मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाचा मनोज जरांगे पाटील यांचा प्रदीर्घ लढा संपला. गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षणाच्या मागणीसाठी, मराठा समाजासाठी सर्वस्व देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या पदरात आरक्षण मिळाल्याने त्यांच्या लढ्याला मोठे यश मिळाले.

२६ जानेवारी रोजी पहाटे वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये जरांगे पाटील लाखो आंदोलकांसोबत पोहोचले. तेथे सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांच्याशी चर्चा केली. आणि अखेर मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या. मागण्या मान्य झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी रात्री दोन वाजता पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी सर्व मागण्या मान्य झाल्या असून त्याचे अध्यादेश निघाल्याचे सांगितले.

सग्यासोय-यांबद्दल अध्यादेश
कुणबी प्रमाणपत्राच्या ज्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांना प्रमाणपत्र द्यावे तसेच त्यांच्या कुटुंबांना सुद्धा प्रमाणपत्र द्यावे ही मागणी मान्य झाली आहे. तसेच सरकारने सग्यासोय-याबद्दल अध्यादेश काढला आहे. तो मला देण्यात आल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR