40.2 C
Latur
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रबारामती मतदारसंघात अखेरच्या दिवशी २४ उमेदवारांचे अर्ज

बारामती मतदारसंघात अखेरच्या दिवशी २४ उमेदवारांचे अर्ज

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण ५१ उमेदवारांनी ६६ अर्ज दाखल केले असून, यापैकी अखेरच्या दिवशी (शुक्रवार, दि. १९ एप्रिल) २४ उमेदवारांनी २८ अर्ज दाखल केले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) सुनेत्रा पवार या नणंद-भावजयीमध्येच मुख्य लढत रंगणार आहे. दरम्यान, २० एप्रिल (शनिवारी) रोजी अर्जांची छाननी होणार आहे, तर २२ एप्रिलपर्यंत अर्ज माघारी घेण्याचा दिवस आहे. अर्ज माघारी घेतल्यानंतरच निवडणुकीचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.

बारामती मतदारसंघासाठी १२ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. यामध्ये प्रामुख्याने महाआघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे, महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सचिन दोडके यांनी पूरक (डमी) अर्ज दाखल केला आहे.

या दोन प्रमुख उमेदवारांमध्येच खरी लढत होणार असली, तरी या मतदारसंघातून इतर स्थानिक पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. शनिवारी (दि. २०) उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी करण्यात येईल, तर उमेदवारांना अर्ज माघारीसाठी सोमवारी (दि. २२) दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत आहे. बारामती मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती बारामतीच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR