सध्या भारतातील सोशल मीडिया विश्वात आणि राजकीय वर्तुळात एका वेगळ्याच नावाची चर्चा अत्यंत वेगाने पसरत आहे—’कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP). सुरुवातीला निव्वळ एक विनोद किंवा ‘मीम’ वाटणाऱ्या या डिजिटल अकाऊंटने अवघ्या काही दिवसांत इन्स्टाग्रामवर करोडो (१५ दशलक्षांहून अधिक) फॉलोअर्सचा टप्पा पार करत देशातील मोठ्या राजकीय पक्षांनाही मागे टाकले आहे. ‘एक्स’वर (ट्विटर) या पक्षाचे हँडल ब्लॉक करण्यात आले, तरीही दुसऱ्याच दिवशी नव्या खात्यावरून “तुम्हाला वाटलं आम्ही संपलो? lol” म्हणत त्यांनी पुन्हा पुनरागमन केले. वरवर हा डिजिटल पोरखेळ वाटू शकतो, पण यामागचा सुशिक्षित तरुणांचा आक्रोश आणि व्यवस्थेबद्दलची तीव्र चीड समजून घेणे गरजेचे आहे.
पार्श्वभूमी: सर्वोच्च न्यायालयातील ‘त्या’ वक्तव्याची ठिणगी
या संपूर्ण आंदोलनाची सुरुवात १५ मे २०२६ रोजी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या एका सुनावणीदरम्यान झाली. देशातील बेरोजगार तरुणांबद्दल बोलताना मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी एका प्रकरणात टिप्पणी करताना म्हटले की, “काही तरुण झुरळांसारखे (कॉक्रोच) असतात, ज्यांना कोणताही रोजगार मिळत नाही. ते मीडिया, सोशल मीडिया किंवा आरटीआय कार्यकर्ते बनतात आणि व्यवस्थेवर हल्ले करू लागतात.” या वक्तव्याने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या, रोजगाराच्या शोधात भटकणाऱ्या देशातील करोडो तरुणांच्या जखमेवर मीठ चोळले. या अपमानाचे रूपांतर ३० वर्षीय राजकीय रणनीतीकार अभिजीत दिपके यांनी एका डिजिटल आंदोलनात केले आणि ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) जन्माला आली.
‘झुरळ’ हेच प्रतिकाराचे प्रतीक का?
‘झुरळ’ (Cockroach) हा कीटक अत्यंत प्रतिकूल आणि कठीण परिस्थितीतही स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी ओळखला जातो. अणुबाँबच्या स्फोटातही झुरळ मरत नाही, हाच वैज्ञानिक धागा पकडत तरुणांनी व्यवस्थेला उत्तर दिले आहे. “तुम्ही आम्हाला झुरळ समजता ना? मग लक्षात ठेवा, झुरळं सर्वात घाणेरड्या आणि सडलेल्या व्यवस्थेतच वेगाने वाढतात. हीच झुरळं आता एकत्र येऊन तुमच्या कुजलेल्या सिस्टीमला प्रश्न विचारणार आहेत.” या पक्षाने स्वतःला “तरुणांची, तरुणांसाठी आणि तरुणांद्वारे चालवली जाणारी—धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकशाहीवादी आणि आळशी संघटना” घोषित केले आहे.
तरुणांचा संताप आणि मराठवाड्याची दाहक वस्तुस्थिती
हा ट्रेंड महाराष्ट्रात आणि विशेषतः मराठवाड्यात एवढ्या वेगाने का पसरतोय, याच्या मुळाशी गेले तर आजच्या सुशिक्षित तरुणांची हताशता दिसून येते. लातूर, नांदेड, परभणी (पूर्णा) यांसारख्या शैक्षणिक केंद्रांमध्ये लाखो तरुण घरदार सोडून, रात्रं-दिवस अभ्यासिकांमध्ये (लायब्ररी) बसून ‘नीट’ (NEET), ‘एमपीएससी’ (MPSC) किंवा इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. मात्र, वारंवार होणारे पेपर फुटीचे घोटाळे, वेळेवर न लागणारे निकाल आणि वाढती बेरोजगारी यामुळे या तरुणांचे भविष्य अंधारात आले आहे. अशा परिस्थितीत जेव्हा सर्वोच्च पदावरील व्यक्तीकडून त्यांच्या गरिबीची आणि बेरोजगारीची थट्टा उडवली जाते, तेव्हा सोशल मीडियावरील हा संतापाचा स्फोट स्वाभाविक आहे. केवळ ऑनलाईनच नाही, तर अनेक शहरांमध्ये तरुण आता थेट ‘कॉक्रोच’चे कॉस्च्युम घालून रस्त्यावरील कचरा साफ करण्याचे आणि प्रशासनाचा निषेध करण्याचे अनोखे आंदोलन करत आहेत.
पक्षाचा उपरोधिक जाहीरनामा (Manifestो) आणि गंभीर मागण्या
सीजेपीने (CJP) थट्टेच्या सुरात देशातील गंभीर मुद्द्यांवर बोट ठेवले आहे.
न्यायाधीशांवर निर्बंध: निवृत्तीनंतर कोणत्याही मुख्य न्यायमूर्तींना राज्यसभेची जागा किंवा सरकारी पद बक्षीस म्हणून दिले जाऊ नये.
महिलांना ५०% आरक्षण: संसदेची सदस्यसंख्या न वाढवता महिलांना थेट ५०% आरक्षण आणि मंत्रिमंडळात अर्ध्या जागा द्याव्यात.
पारदर्शकता: हा पक्ष स्वतः माहिती अधिकाराच्या (RTI) कक्षेत असेल आणि कोणताही गुप्त ‘कॉक्रोच केअर्स फंड’ किंवा इलेक्टोरल बाँड्स स्वीकारणार नाही.
पेपरफुटीवर कारवाई: ‘नीट’ (NEET) सारख्या परीक्षांमधील घोटाळ्यांची चौकशी करून शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा.
या पक्षाचे सदस्य होण्यासाठी पात्रताही तितकीच उपरोधिक आहे: तरुण बेरोजगार असावा, दिवसातून किमान ११ तास ऑनलाईन राहणारा असावा आणि व्यवस्थेवर खरीखुरी भडास काढता येणारा असावा!
मुख्य प्रवाहातील राजकीय पक्षांना धोक्याची घंटा
आजवर सर्वच राजकीय पक्षांनी तरुणांचा वापर केवळ निवडणुकीत सतरंज्या उचलण्यासाठी, रॅलीमध्ये गर्दी करण्यासाठी किंवा सोशल मीडियावर आयटी सेलचे ट्रोल म्हणून केला. पण काँग्रेस खासदार शशी थरूर आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनीही या चळवळीची दखल घेत तरुणांच्या या अभिव्यक्तीचे समर्थन केले आहे. सोशल मीडियावरील हा डिजिटल असहकार हे दाखवून देतो की, तरुणांचा आता प्रस्थापित राजकारणावरील विश्वास उडाला आहे.
याकडे दुर्लक्ष करणे महागात पडेल!
‘कॉक्रोच जनता पार्टी’ उद्या प्रत्यक्ष निवडणूक लढवून सत्ता स्थापन करेल का? याचे उत्तर ‘नाही’ असेच आहे. कारण हे एक प्रतीकात्मक आणि वैचारिक बंड आहे. परंतु, सत्ताधाऱ्यांनी किंवा विरोधकांनी याला केवळ एक ‘टाईमपास मीम ट्रेंड’ म्हणून हलक्यात घेण्याची चूक करू नये. जेव्हा देशातील तरुण रोजगाराच्या अभावामुळे स्वतःची ओळख ‘झुरळ’ म्हणून अभिमानाने सांगू लागतो, तेव्हा समजून जावे की लोकशाहीतील मुख्य संवाद यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. हा भारतातील ‘जेन-झी’ (Gen-Z) आणि तरुण पिढीचा डिजिटल असहकार आहे. जर त्यांच्या हक्काच्या रोजगारावर आणि सन्मानावर वेळेत ठोस निर्णय घेतले गेले नाहीत, तर आज स्क्रीनवर कोट्यवधींच्या संख्येने दिसणारा हा ‘कॉक्रोच’चा ट्रेंड उद्या रस्त्यावर उतरून प्रस्थापित राजकारणाची समीकरणे बदलल्याशिवाय राहणार नाही!
















