33.7 C
Latur
Saturday, May 11, 2024
Homeमहाराष्ट्रबारावीच्या परीक्षेला सुरूवात

बारावीच्या परीक्षेला सुरूवात

पुणे : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात येणारी बारावीची लेखी परीक्षा बुधवारपासून (दि. २१) सुरू होत आहे. या परीक्षेसाठी राज्यातील एकूण १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

नियमित, खासगीरीत्या परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांसह श्रेणीसुधार योजनेअंतर्गत आयटीआय आणि पुनर्परीक्षार्थी अशा एकूण बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी करणा-या सर्वच विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत विद्यार्थी संख्या ५६ हजार ६१६ ने वाढली आहे.राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या ९ विभागीय मंडळांमार्फत २१ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा आयोजित केली आहे. राज्यातील १० हजार ४९६ कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे. राज्यात ३ हजार ३२० मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित केली आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक उपस्थित होत्या. या परीक्षेसाठी ८ लाख २१ हजार ४५० विद्यार्थ्यांनी आणि ६ लाख ९२ हजार ४२४ विद्यार्थींनींनी नोंदणी केली आहे. एकूण १० हजार ४९७ कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली असून, या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांसाठी ३३२० मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित केली आहे. परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थी नकारात्मक विचार किंवा परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी राज्य मंडळ स्तरावरून समुपदेशन करण्यासाठी १० समुपदेशकांची नियुक्ती केली आहे.

परीक्षार्थ्यांची संख्या
-एकूण विद्यार्थी : १५,१३,९०९
-विद्यार्थी : ८,२१,४५०
-विद्यार्थिनी : ६,९२,४२४

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR