नवी दिल्ली : भारत व व्हिएतनाम यांनी द्विपक्षीय संबंध विस्तारित सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी पर्यंत वाढवत १३ करारांवर स्वाक्षरी केली. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष टू लाम यांच्या भारत दौ-यात रेअर अर्थ आणि क्रिटिकल मिनरल्समधील सहकार्य, पुरवठा साखळी मजबूत करणे आणि दक्षिण चीन सागर क्षेत्रात संतुलन राखण्यावर भर देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लाम यांच्या चर्चेत २०३० पर्यंत वार्षिक २५ अब्ज डॉलर व्यापाराचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले.
संयुक्त निवेदनानुसार, दोन्ही बाजूंनी दक्षिण चीन सागरात आंतरराष्ट्रीय कायदा, विशेषत: सागरी कायद्यावरील संयुक्त राष्ट्र कराराच्या अनुरूप शांतता, स्थिरता आणि नौकानयनाचे स्वातंर्त्य राखण्याची गरज पुनरुच्चारली. तसेच महत्त्वपूर्ण खनिजांच्या क्षेत्रात समन्वय वाढवून आर्थिक सुरक्षा आणि लवचिक पुरवठा साखळी विकसित करण्यावर सहमती दर्शवण्यात आली, तर संरक्षण व सागरी सहकार्यही पुढे नेण्याचे संकेत दिले. टू लाम याच महिन्यात राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. ते मंगळवारी तीन दिवसांच्या पहिल्या राजकीय दौ-यावर भारतात आले आहेत.
व्हिएतनाम भारतीय द्राक्ष चाखणार
व्हिएतनाममध्ये भारतीय औषधांची पोहोच वाढेल. कृषी, मत्स्य आणि पशु उत्पादनांच्या निर्यातीत सुलभता येईल. मोदी म्हणाले, व्हिएतनाम भारताच्या द्राक्ष आणि डाळिंबाची चव चाखणार आहे.
यूपीआयशी जोडणार
वित्तीय संपर्क वाढवण्यासाठी भारताची यूपीआय आणि व्हिएतनामची जलद पेमेंट प्रणाली लवकरच जोडली जाईल.
दहशतवादावर दोन्ही देश कठोर
दहशतवादावर दोन्ही देशांची कठोर भूमिका संयुक्त निवेदनात भारत आणि व्हिएतनामने सर्व प्रकारच्या दहशतवादाचा, विशेषत: सीमापार दहशतवादाचा तीव्र निषेध केला. खनिजांच्या क्षेत्रात समन्वय वाढवून आर्थिक सुरक्षा आणि लवचिक पुरवठा साखळी विकसित करण्यावर सहमती दर्शवण्यात आली, तर संरक्षण व सागरी सहकार्यही पुढे नेण्याचे संकेत दिले. टू लाम याच महिन्यात राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. ते मंगळवारी तीन दिवसांच्या पहिल्या राजकीय दौ-यावर भारतात आले आहेत.

