मुंबई: “मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावर दरड कोसळल्यानंतर काही लोकांनी सरकारवर अवाजवी आणि खोटी टीका केली. मात्र, या सगळ्यांच्या नाकावर टिच्चून सरकारने अवघ्या १८ तासांत येथील वाहतूक पूर्ववत करून दाखवली. मला बदनाम करा, पण महाराष्ट्राला बदनाम करू नका,” अशा आक्रमक शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधक आणि सोशल मीडियावरील टीकाकारांचा चांगलाच समाचार घेतला. बुधवारी विधानसभेत बोलताना त्यांनी या संपूर्ण प्रकरणावर सरकारची बाजू ठामपणे मांडली.
भाड्याचे तट्टू पैसे घेऊन लिहीत होते!
मिसिंग लिंकच्या दुर्घटनेनंतर सोशल मीडियावर झालेल्या टीकेवर मुख्यमंत्री अत्यंत संतप्त पाहायला मिळाले. ते म्हणाले, “ज्यांना कुत्रा विचारत नाही, ते आज सोशल मीडियावर येऊन सगळ्यांना शिव्या देत आहेत. असे भाड्याचे तट्टू मिसिंग लिंकबाबत पैसे घेऊन सोशल मीडियावर लिहीत होते. खोटं बोलताना त्यांना लाजही वाटत नाही. पण एक लक्षात ठेवा, महाराष्ट्राचा अपमान कराल तर मी सोडणार नाही.” तसेच, “१० वर्षांनी मिसिंग लिंक दिमाखात उभी असेल आणि त्यावर देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांचे नाव असेल. आज आमच्यावर टीका करणारे भविष्यात शिल्लकही राहणार नाहीत,” असा टोलाही त्यांनी लगावला.
आयआयटीच्या तज्ज्ञांचा सल्ला घेणार
या दुर्घटनेतून सरकार काही गोष्टी शिकल्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले. पाण्याचा प्रवाह कसा बदलू शकतो आणि दरड कशी कोसळू शकते, याचा अंदाज आल्याचे सांगत त्यांनी भविष्यातील योजनेची माहिती दिली. “आम्ही आता आयआयटी (IIT) मधील तज्ज्ञांचा सल्ला घेऊन नव्या उपाययोजना करणार आहोत, जेणेकरून पुढच्या वर्षी अशी घटना पुन्हा घडणार नाही,” असे फडणवीस म्हणाले.
आघाडी सरकारने जी फाईल बंद केली, ती महायुतीने करून दाखवली!
या प्रकल्पाचा इतिहास सांगताना त्यांनी तत्कालीन आघाडी सरकारवर निशाणा साधला. “आघाडी सरकारच्या काळात मिसिंग लिंकचा प्रस्ताव तयार झाला होता. मात्र, तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी २ पानांचे पत्र लिहून, १४ कारणे देत हा प्रकल्प होऊच शकत नाही असे सांगून फाईल बंद केली होती. पण महायुती सरकारमध्ये हिंमत होती. आम्ही अधिकारी आणि तज्ज्ञांशी बोललो आणि हे काम शक्य करून दाखवले.” या संदर्भात त्यांनी कोकण रेल्वेचे उदाहरण दिले. ते म्हणाले, “मधू दंडवते यांनी हिंमत दाखवून कोकण रेल्वे सुरू केली. त्यानंतर सलग १५ वर्षे पावसाळ्यात तिथे दरडी कोसळत होत्या. पण आपण प्रत्येक वेळी शिकलो आणि काम करत राहिलो. जर तेव्हा घाबरून कोकण रेल्वे सुरूच केली नसती, तर आज काय अवस्था असती?”
‘मिसिंग लिंक’ म्हणजे इंजिनिअरिंग मार्व्हल!
देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाच्या भव्यतेची माहिती देताना सांगितले की, “ही फक्त मिसिंग लिंक नाही, तर एक ‘इंजिनिअरिंग मार्व्हल’ (अभियांत्रिकीचा चमत्कार) आहे. हा भारतातील सर्वात उंच केबल स्टेड ब्रिज आणि जगातील सर्वात रुंद बोगदा आहे. ताशी १७० किमी वेगाने वारा वाहतो, अशा आव्हानात्मक ठिकाणी आपण हा प्रकल्प उभारला असून यामुळे घाटातील ट्रॅफिक पूर्णपणे संपले आहे.”
‘बोगदा होता म्हणून आम्ही वाचलो!’
बोगद्याच्या सुरक्षेबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “दुर्घटना घडली तेव्हा वरून दरड कमानीवर कोसळली आणि ढिगारा खाली आला. बोगद्याला कोणतीही अडचण आली नव्हती. प्रवाशांनी बोगद्यातील इमर्जन्सी बटन दाबल्यानंतर अवघ्या तीन मिनिटांत तिथे क्रेन पोहोचली. स्वतः प्रवाशांनी सांगितले की बोगदा होता म्हणूनच आम्ही वाचलो. पण काही लोकांनी लगेच पाणी पडत असल्याचे व्हिडिओ दाखवून ७००० कोटी पाण्यात गेले, अशी आवई उठवली. या सगळ्यांच्या थोबाडावर टिच्चून आम्ही १८ तासांत ट्रॅफिक सुरू करून दाखवले.”
















