सोलापूर : सांगोला- सातारा-सांगोला-पंढरपूर -दादर ही एक्स्प्रेस रेल्वे सध्या आठवड्यातील तीन दिवस असून सदर रेल्वे ही दररोज करावी अशी मागणी शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मुंबई रेल्वे ज्या दिवसापासून सुरू केली आहे, त्या दिवसापासून या रेल्वेस कवठेमहंकाळ, ढालगाव, जत रोड, म्हसोबा डोंगरगाव, सांगोला या रेल्वे स्टेशनवरून प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. आठवड्यातील तीन दिवस या रेल्वेस आरक्षणाकरिता प्रतीक्षा सुरू असून सर्वसाधारण डब्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी होत आहे. त्यासाठी सदर गाडीस आणखीन तीन सर्वसाधारण डबे जोडावेत, त्यामुळे रेल्वेच्या उत्पन्नातही वाढ होईल व प्रवाशांची सोय होईल याचा विचार रेल्वे मंडळाने करावा, अशी मागणी करण्यात आली.
उन्हाळा सुटीमुळे प्रवासात मोठया प्रमाणात वाढ झालीच आहे. परंतु या भागातून वर्षाचे ३६५ दिवस १५ ते २० ट्रॅव्हल्स दररोज मुंबईला जातात. सदर गाडी दररोज सुरू झाल्यास मुंबईतील नागरिकांबरोबर दुष्काळीपट्ट्यातील नागरिकांची सोय होईल, कोरोनापूर्वी विजापूर मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस धावत होती ती बंद करण्यात आली असून त्याचा रेक उपलब्ध असून उर्वरित तीन दिवसांकरिता सातारा-पंढरपूर-दादर-सातारा या मार्गावर रेक वापरल्यास आठवड्यातील सगळे दिवस मुंबईला जाण्याकरिता मिरजपासून सांगोल्यातील सर्व स्टेशन परिसरातील प्रवाशांची जाणेयेण्याची अल्पखर्चात मोठी सोय होईल. तरी वरिष्ठांनी याची दखल घेऊन दादर-पंढरपूर-सातारा दररोज रेल्वेगाडी सुरू करावी, अशा मागणीचे निवेदन शहीद कामटे संघटनेचे संस्थापक नीलकंठ शिंदे यांनी वरिष्ठांकडे दिले आहे.