मुंबई : विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये रानटी हत्ती आणि मानवामधील संघर्ष अत्यंत तीव्र आणि चिंताजनक बनला आहे. रानटी हत्तींच्या हल्ल्यात आतापर्यंत चार निष्पाप नागरिकांचा जीव गेला असून, या गंभीर मुद्यावर काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत आवाज उठवला. वन्यप्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून सरकारने यावर ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी त्यांनी केली.
विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात २ जुलै रोजी घडलेली एक अत्यंत वेदनादायी घटना निदर्शनास आणून दिली. त्यांच्याच मतदारसंघात येणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात, व्याहाड-सोनापूर मार्गावर अतुल गोहने या ३० वर्षीय तरुणाचा रानटी हत्तीच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. दुचाकीने जात असताना समोर अचानक हत्ती आल्याने जीव वाचवण्यासाठी अतुलने पळण्याचा प्रयत्न केला, मात्र हत्तीने त्याचा पाठलाग करून त्याला जागीच चिरडले. ही घटना अत्यंत धक्कादायक असून वन विभागाच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.
सध्या ३० ते ३२ रानटी हत्तींचा कळप चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात धुमाकूळ घालत असून हत्तींमुळे शेकडो घरे, झोपड्या आणि शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. वन विभागाच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेत वडेट्टीवार म्हणाले की, वन विभागाकडून केवळ हत्ती हाकलण्याचे जुजबी प्रयत्न केले जात आहेत. हे हत्ती गडचिरोलीतून हाकलले की चंद्रपूर जिल्ह्यात येतात आणि चंद्रपुरातून हाकलले की पुन्हा गडचिरोलीत जातात. वन विभागाचा हा केवळ तात्पुरता खेळ सुरू असून यावर कोणतीही कायमस्वरूपी यंत्रणा नाही. खाणकाम आणि जंगलांवरील अतिक्रमणामुळे हत्तींचे पारंपरिक मार्ग बदलल्यानेच हा संघर्ष वाढला आहे.
या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी वडेट्टीवार यांनी सरकारकडे प्रमुख मागण्या केल्या. हत्ती आणि मानवाचा संघर्ष हाताळण्यासाठी वन कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात यावे, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हत्तींच्या हालचालींवर २४ तास लक्ष ठेवले जावे, हत्ती मानवी वस्तीत येण्यापूर्वीच नागरिकांना सतर्क करणारी पूर्वसूचना किंवा अलर्ट यंत्रणा उभी करावी, आणि या संपूर्ण समस्येचा अभ्यास करून उपाययोजना करण्यासाठी तातडीने ‘विशेष टास्क फोर्स’ स्थापन करण्यात यावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन विधानसभा अध्यक्षांनीही अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. आजच्या आधुनिक युगात तंत्रज्ञान उपलब्ध असतानाही जर आपण हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवू शकत नसू, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात निष्पाप मानवी जीव जाणे अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असे स्पष्ट करत शासनाने या प्रकरणाची तातडीने नोंद घ्यावी आणि या समस्येवर काय ठोस उपाययोजना करणार आहे याचे सविस्तर निवेदन सभागृहात सादर करावे, असे कडक निर्देश अध्यक्षांनी राज्य सरकारला दिले आहेत.















