मुंबई (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी व भाजपा आमदार राजेंद्र पाटणी यांना श्रद्धांजली अर्पण करून, विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज आज तहकूब करण्यात आले.
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सुरुवात झाली. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी व भाजपा आमदार राजेंद्र पाटणी यांचे २३ फेब्रुवारी २०२४ रोजी दु:खद निधन झाले. ते दोन्ही सभागृहाचे सदस्य राहिले आहेत. विधानसभेत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तर विधान परिषदेत उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करणारा प्रस्ताव मांडला. सामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या मनोहर जोशी यांनी स्वत:च्या कर्तृत्वावर उत्तुंग झेप घेतली. कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्युटच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात भरीव कार्य केले आहे. एक रुपयात झुणका भाकर, झोपडपट्टीवासीयांना मोफत घरे यासारख्या योजना त्यांनी मोठ्या धाडसाने राबवल्याचा उल्लेख त्यांनी केला.