मुंबई (प्रतिनिधी) : मनोज जरांगे-पाटील यांच्या वक्तव्यांमुळे जर राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होत असेल, गृहमंत्री पदासारख्या संवैधानिक पदावर बसलेल्या नेत्याच्या विरोधात वक्तव्य करून आव्हान दिले जात असेल तर कायदा आपले काम करेल, असा इशारा राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे. जरांगे यांची सगळी वक्तव्यं तपासली जातील. त्यांच्या सगळ्या वक्तव्यांची चौकशी केली जाईल आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जे जे करणे आवश्यक असेल ते आमचे पोलिस निश्चितपणाने करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले आहे. उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्या वेळी ते बोलत होते. जरांगे-पाटलांनी संयम पाळला पाहिजे. माझा त्यांना एक मित्रत्वाचा त्यांना सल्ला राहील की, त्यांनी आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे. स्वत:च्या सततच्या आंदोलनामुळे व उपोषणामुळे त्यांच्या प्रकृतीला थोडासा आराम मिळला पाहिजे म्हणून त्यांनी शांत डोक्यानं, शांत पद्धतीने विश्रांती घ्यावी. सरकार केव्हाही कुणाबरोबरही चर्चा करायला तयार आहे त्यामुळे त्यांचं काय म्हणणं असेल आरक्षणाबाबत सरकारची चर्चा करावी सरकारची चर्चेची दारे नेहमीच खुली आहेत, असे त्यांनी या वेळी स्पष्ट केले तर महायुतीतील नेत्यांविरोधात एकेरी उल्लेख जरंगे-पाटलांनी थांबवला नाही तर त्याला त्यांना त्याचे भविष्यात होणा-या परिणामाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.