लातूर : प्रतिनिधी
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील कारंजे खडी केंद्राच्या लाईनमधील चार दुकानांना दि. ४ एप्रिल रोजी रात्री ९.४५ वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत चारही दुकाने जळून भस्म झाली आहेत. अग्निशमनदलाच्या अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आणण्यात आली परंतू, तोपर्यंत या चारही दुकानांतील माल जळून लाखोंचे नूकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरील कारंजे खडी केंद्राच्या लाईनमध्ये कांचन मल्टिीस्टेट, जमजम मोबाईल, पान व्हीला व श्री व्यंकटेश खडी केंद्र ही चार दुकाने आहेत. गुरुवारी रात्री ९.४५ वाजण्याच्या सुमारास या चार दुकानांपैकी एका दुकानात शॉर्ट सर्कीट झाला असावा व त्यामुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आग एवढी भीषण होती की दूकानाचे पत्रे लाल होऊन जळाले. आतील सर्व साहित्य जळाले. चारही दुकानांतील सर्व साहित्य जळून भस्म झाले. लाखो रुपयांचे नूकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रम करुन आग आटोक्यात आणली. घटनास्थळी बघ्यांची आणि रिल्सवाल्यांची प्रचंड गर्दी होती. या गर्दीचा अग्निशमन दलाच्या जवानांना मोठा त्रास झाला.