परभणी : परभणीतील अंगणवाड्यांना गरम व ताजा आहार पुरवठा करण्यासाठी ई-निविदा (ई-टेंडर) प्रक्रिया तातडीने राबविण्याच्या मागणीसाठी महिला बचत गट, महिला मंडळ व स्वयंसेवी संस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि. ८ जुलै पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाची प्रशासनाने दखल न घेतल्याने रविवार, दि. १२ जुलै रोजी पाचव्या दिवशीही उपोषण सुरूच होते. दरम्यान, सलग उपोषणामुळे उपोषणकर्त्या कल्पना दळवी, शेख मुमताज या २ महिलांची प्रकृती खालावली असून उपचारासाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
फौजिया बहुउद्देशीय सेवाभावी संस्था परभणीच्या अध्यक्ष शेख मुमताज यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. या संदर्भात दि. २५ जून २०२६ रोजी जिल्हाधिका-यांना निवेदन देऊन अंगणवाड्यांना आहार पुरवठा करण्यासाठी ई-निविदा काढण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र प्रशासनाने याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही न केल्याने महिला बचत गटांनी दि. ८ जुलैपासून आमरण उपोषण सुरू केले. या उपोषणात कल्पना दळवी, शेख मुमताज, मीना चव्हाण, उषा पंचांगे, उषा बिडवे, तसलीम पठाण यांचा सहभाग आहे. उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे की, शासनाच्या नियमानुसार अंगणवाड्यांना गरम व ताजा आहार पुरवठ्यासाठी ई-निविदा प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित विभागाकडून निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नसल्याने महिला बचत गटांवर अन्याय होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
दरम्यान उपोषणाच्या पाचव्या दिवशी कल्पना दळवी व शेख मुमताज या दोन महिलांची प्रकृती बिघडल्याने आंदोलनस्थळी काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर संबंधित महिलांना तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रशासनाने तात्काळ ई-निविदा प्रक्रिया सुरू करून महिला बचत गटांना न्याय द्यावा. अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी परभणी यांनाही देण्यात आले आहे.
















