कलपक्कम : अणुऊर्जा क्षेत्रात भारताने पुन्हा एकदा आपला डंका वाजवून संपूर्ण जगालाच आश्चर्यचकित केले आहे. तामिळनाडूतील कलपक्कम येथील अणुऊर्जा संयंत्राने क्रिटिकॅलिटी (क्रांतिकता) साध्य करून नुकता भारताच्या ऊर्जा क्षेत्रात एक नवा इतिहास रचला आहे. महत्वाचे म्हणजे, भारताचा अणुऊर्जा कार्यक्रम याच गतीने पुढे जात राहिला तर, या क्षेत्रातही भारत आत्मनिर्भर होण्यास वेळ लागणार नाही. याचे महत्व म्हणजे, आता भारत पारंपारिक जीवाश्म इंधनावर अवलंबून न राहता, लवकरच स्वच्छ आणि अक्षय ऊर्जा निर्माण करण्यासाठी सिद्ध होईल.
जगातील कोणताही देश मदतीसाठी तयार झाला नाही, अखेर ४० वर्षांच्या मेहनतीचे गोड फळ मिळाले. गेल्या ४० वर्षांपासून भारत फास्ट ब्रीडर टेस्ट रिएक्टरमध्ये विविध प्रयोग करत होता. जगातील कोणताही देश आपले संवेदनशील अणुऊर्जा तंत्रज्ञान भारताला देण्यास तयार झाला नाही. यामुळे आयजी-सीएआरने स्वत:च्या ताकदीवर पूर्ण क्षमतेचा फास्ट ब्रीडर रिएक्टर बनवण्याचे शिवधनुष्य पेलले आणि आज कलपक्कममध्ये त्याचे गोड फळ मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ६ एप्रिल रोजी या यशाची घोषणा केली. त्यांनी, या यशाला भारताच्या नागरी अणु प्रवासातील एक निर्णायक पाऊल म्हटले आहे. जर हा प्रकल्प सर्व चाचण्यांमध्ये यशस्वी झाला आणि व्यावसायिक ग्रिडशी जोडला गेला, तर रशियानंतर व्यावसायिक स्तरावर फास्ट ब्रीडर रिएक्टर चालवणारा भारत जगातील दुसरा देश ठरेल. हे भारताच्या त्री-स्तरीय अणुऊर्जा कार्यक्रमाच्या दुस-या टप्प्यातील सर्वात मोठे यश आहे, जे भविष्यात भारताच्या अफाट थोरियम साठ्याचा वापर करण्याचा मार्ग सुकर करते.
अणुऊर्जा संयंत्राचे वैशिष्ट्य
कलपक्कम येथील प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिएक्टर (पीएफबीआर) हा भारताचा पहिला स्वदेशी फास्ट ब्रीडर अणुभट्टी प्रकल्प आहे. ५०० मेगावॅट क्षमत असेलेल्या या प्रगत रिएक्टरची रचना इंदिरा गांधी अणु संशोधन केंद्राने केली असून भाविनीद्वारे याची निर्मिती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, हा प्रकल्पासाठी २०० हून अधिक भारतीय उद्योगांचे आणि लघू तथा मध्यम उद्योगांचे मोठे योगदान आहे.
४०० वर्षांपर्यंत टेन्शन मिटणार
भारताकडे जगातील केवळ १ टक्का युरेनियमचाच साठा आहे. मात्र, जगातील एकूण थोरियमपैकी २५ टक्के साठा एकट्या भारतात आहे. सध्या भारत उर्जेसाठी आयातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे, परंतु या रिअॅक्टरच्या यशामुळे भारत आपल्या थोरियम साठ्यातून पुढील ४०० वर्षांपर्यंत ५०० गिगावॅट वीज निर्माण करू शकेल. यामुळे भारत परदेशी इंधनाशिवाय अणुऊर्जेत पूर्णपणे आत्मनिर्भर होईल.
अमेरिका, फ्रान्स, जपाननेही हार मानली
फास्ट ब्रीडर तंत्रज्ञान अत्यंत क्लिष्ट आहे. अमेरिका, फ्रान्स आणि जपानसारख्या प्रगत देशांनीही तांत्रिक आणि आर्थिक कारणांमुळे त्यांचे कार्यक्रम बंद केले आहेत. अशा स्थितीत भारताचे हे यश अतुलनीय आहे.
मोठा आर्थिक लाभ आणि भू-राजकीय सुरक्षा
देशाला स्वस्त आणि मुबलक वीज मिळाल्यास स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल आणि डिझेलवरील आपले अवलंबित्व कमी होईल. तसेच, पश्चिम आशियातील तणाव किंवा लाल समुद्रातील संकटासारख्या जागतिक घडामोडींमुळे उद्भवणा-या तेल आणि गॅस टंचाईपासून भारताची अर्थव्यवस्था सुरक्षित राहील. यामुळे भारत ऊर्जा क्षेत्रातही आत्मनिर्भर होईल.

