वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के कर लादला आहे. अमेरिकेच्या या धोरणामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला फटका बसण्याची शक्यता होती. मात्र या कराचा कोणताही परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर झालेला नाही. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने(आयएमएफ) २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी भारताचा जीडीपी वाढणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. आयएमएफने जीडीपी ०.२ टक्क्यांनी वाढून तो ६.६ % असेल असे म्हटले आहे. आयएमएफच्या अंदाजामुळे अमेरिकेचा डाव फसला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार भारताचा जीडीपी एप्रिल-जून या पहिल्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने म्हणजे ७.८ % वाढला. देशांतर्गत व्यापार मजबूत झाल्याने हा वेग जास्त राहिला. यामुळे अमेरिकेने भारतावर ५० टक्के कर लादला तरी भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था होती. याचाच अर्थ अमेरिकेच्या निर्णयाचा कोणताही परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर झाला नाही. उलट भारताचा विकासदर वाढला आहे.
आयएमएफने काय म्हटले?
आयएमएफने आपल्या अहवालात म्हटले की. २०२५-२६ साठी भारताचा विकास दर पहिल्या तिमाहीत वेगाने वाढला. त्यामुळे अमेरिकेने लादलेल्या शुल्कामुळे होणारे भरून निघाले आहे. यंदाच्या वर्षी भारताचा विकासदर ६.४ वरून वाढवून ६.६ टक्के करण्यात आला आहे. मात्र पुढील आर्थिक वर्षासाठी भारताचा विकासदर कमी होईल असे आयएमएफने म्हटले आहे. २०२६-२७ साठी भारताचा विकासदर अंदाजे ०.२ टक्क्यांनी कमी होऊन तो ६.२% असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याचात अर्थ भारताच्या विकासदरात घट होणार आहे.
जागतिक बँकेचाही सकारात्मक अंदाज
जागतिक बँकेने गेल्या आठवड्यात २०२५-२६ साठी भारताचा विकासदर ६.३% वरून ६.५% पर्यंत वाढवला होता. तसेत पुढील आर्थिक वर्षात विकासदर ६.५ % वरून ६.३% पर्यंत कमी केला होता. त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही चालू वर्षांच्या अंदाजात वाढ केली आहे, ही भारतासाठी आनंदाची बातमी आहे. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का बसला आहे. अमेरिकेने भारतावर कर लादून अर्थव्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आता जागतिक बँक आणि आयएमएफच्या अंदाजांमुळे अमेरिकेचा निर्णय फसल्याचे समोर आले आहे.

