रत्नागिरी: कोकणातील लक्षवेधी लढत असणा-या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. या मतदारसंघात ठाकरे गटाचे विनायक राऊत आणि भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे रिंगणात आहेत. नारायण राणे यांनी आज सकाळीच मतदानाचा हक्क बजावत रत्नागिरी-सिंधुदुर्गातून मोठ्या विजयाचा दावा केला. मात्र, त्याचवेळी एका गोष्टीमुळे रत्नागिरी-सिंधुदुर्गात महायुतीची धाकधूक वाढली आहे. आज सकाळपासून उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे नॉट रिचेबल आहेत.
किरण सामंत यांचे कार्यकर्ते हे सकाळपासून त्यांना फोन लावत आहेत. मात्र, अद्याप कोणाचाही किरण सामंत यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. किरण सामंत हे रत्नागिरी-सिंधुदुर्गातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. त्यासाठी सामंत बंधूंनी शेवटच्या क्षणापर्यंत किल्ला लढवला होता.
मात्र, शेवटी देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे यांच्या पारड्यात दान टाकल्याने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची उमेदवारी त्यांना मिळाली होती. यानंतर किरण सामंत आणि उदय सामंत महायुतीचा धर्म पाळत कामाला लागले होते. परंतु, आता सर्वकाही सुरळीत सुरू असताना ऐन मतदानाच्या दिवशीच किरण सामंत नॉट रिचेबल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे सध्या भाजप आणि शिंदे गटाच्या गोटातील धाकधूक वाढली आहे.