मुंबई : कॉकरोच जनता पार्टीच्या देशभरातील आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सायबर या राज्य सरकारच्या नोडल एजन्सीने डिजिटल विश्वात एक अत्यंत मोठी आणि धडक कारवाई केली आहे. सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करण्यासाठी सीमेपलीकडून चालवल्या जाणा-या ५०० हून अधिक संशयास्पद सोशल मीडिया प्रोफाइलची ओळख पटवण्यात आली आहे. या आंदोलनाचा गैरफायदा घेत सोशल मीडियावर अफवा, चुकीची माहिती आणि एआय-जनरेटेड बनावट मजकूर पसरवण्याचे मोठे आंतरराष्ट्रीय कारस्थान तपासात उघडकीस आले आहे.
महाराष्ट्र सायबरने ओपन-सोर्स इंटेलिजन्स, डेटा विश्लेषण, वर्तणूक अभ्यास आणि अत्याधुनिक एआय-फॉरेन्सिक उपकरणांचा वापर करून व्यापक तपास मोहीम राबवली. या तांत्रिक विश्लेषणात खालील धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय कट : सुमारे १०० सोशल मीडिया खाती भारताबाहेरून, विशेषत: पाकिस्तान आणि पश्चिम आशियातील देशांमधून चालवली जात असल्याचे निष्पन्न झाले.
आक्षेपार्ह पोस्टवर कारवाई : इन्स्टाग्राम, एक्स (ट्विटर), फेसबुक आणि युट्यूब या प्लॅटफॉर्मवरील तब्बल ४२९ आक्षेपार्ह पोस्ट आणि हँडल्स ओळखण्यात आले आहेत.
एआय आणि डीपफेकचा वापर : १४० हून अधिक पोस्ट आणि प्रोफाईलमध्ये गर्दीची खोटी चित्रे, कृत्रिम आवाज आणि लोकप्रतिनिधींचे व्हीडीओ मॉर्फ करून तयार केलेले डीपफेक व्हीडीओ वापरण्यात आले होते.
महाराष्ट्र सायबरच्या अत्याधुनिक ऑडिओ-व्हीडीओ फॉरेन्सिक टीमने या सर्व बनावट कंटेटची वैज्ञानिक पडताळणी केली आहे. संबंधित सर्व आक्षेपार्ह मजकूर आणि खाती तात्काळ ब्लॉक करण्यासाठी सोशल मीडिया मध्यस्थांमार्फत कायदेशीर कारवाई आणि प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात आली आहे. कोणत्याही संवेदनशील विषयांवर सोशल मीडियावर व्यक्त होताना किंवा माहिती शेअर करताना नागरिकांनी अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन महाराष्ट्र सायबरने केले आहे. कोणतीही बातमी किंवा व्हिडीओ दिशाभूल करणारा वाटल्यास क्षणात पुढे पाठवणे टाळा. पडताळणी करा माहिती अधिकृत शासकीय स्रोतांकडून किंवा विश्वासार्ह वृत्तसंस्थांकडून तपासून घ्या. जबाबदारीने शेअर करा. खात्री पटल्याशिवाय कोणताही मजकूर फॉरवर्ड करू नका. सामाजिक शांतता बिघडवणा-या संघटित नेटवर्कवर अशीच कठोर कायदेशीर कारवाई पुढेही सुरू राहील, असा कडक इशारा देण्यात आला आहे.
















