34.6 C
Latur
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात महविकास आघाडीला बहुमत मिळेल : चव्हाण

राज्यात महविकास आघाडीला बहुमत मिळेल : चव्हाण

पुणे : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षाची मतविभागणी टाळण्यावर महाविकास आघाडीचा अधिक भर असणार आहे. तसेच राज्यात महविकास आघाडीला बहुमत मिळेल असा विश्वास राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते म्हणाले, आजवर राज्यातील ४८ पैकी ४६ लोकसभा मतदार संघात उमेदवारीचा निर्णय एकमताने झाला आहे. उर्वरित दोन जागेबाबत निर्णय लवकरच घेण्यात येईल. सर्व कार्यकर्ते एकदिलाने काम करीत आहेत. कोठेही नाराजी नाही. राज्यात राजकीय अस्थिरता आहे. जरी काही पक्षाच्या लोक प्रतिनिधींनी भूमिका बदलली असली तरीही मतदार त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत.काही राज्यात इंडिया आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला आहे असे नमूद करुन ते म्हणाले, विरोधी आघाडीच्या मताचे विभाजन करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे पण जनतेचा निर्णय ठरला आहे तो म्हणजे केंद्र सरकारचा पराभव करणे. त्यामुळे महाराष्ट्रात निवडणुकीत अनपेक्षित निकाल लागतील असे ते म्हणाले.

गेल्या दहा वर्षांत देशाच्या विकास दरात घसरण झाली आहे त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे असे त्यांनी सांगितले.पुणे लोकसभेचे महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे उमेदवार आमदार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. यावेळी माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळातील विकास दर जेवढा होता, तेवढा विकास दर आताच्या काळात राहिला असता तर आपली अर्थव्यवस्था आज जगात तिस-या नंबरवर गेली असती. मात्र, गेल्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये अर्थव्यवस्थेचा दर खाली आला आहे. देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे.

मोदी सरकारने दहा वर्षात काय केले याचा कार्य अहवाल तयार करावा आणि प्रसिध्द करावा म्हणजे २०१४ पूर्वी आणि नंतर काय झाले याची तुलना करता येईल. दरवर्षी २ कोटी लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. दहा वर्षात २० कोटी लोकांना रोजगार मिळायला हवा होता, मात्र काहीच झाले नाही, उलट देशात बेरोजगारी वाढली. डिझेल पेट्रोलचा भाव ३५ रुपये करण्याचे आश्वासन दिले होते, यांशिवाय शंभर शहरे स्मार्ट सिटी करण्याचे आश्वासन दिले, मात्र त्याचे काय झाले याचा अहवाल तयार करावा, असेही चव्हाण म्हणाले..

शेतकरी वर्गाला विश्वासात न घेता शेतीसंदर्भात तीन कायदे केले. शेती मालास भाव नाही. कांदा, गहू, साखर, तांदुळ यांवर निर्यातबंदी घातल्यामुळे भाव पडले आहेत. त्यामुळे या निवडणुकीमध्ये शेतक-यांचे मतदान महत्वाचे आहे. सन २०१९ मध्ये सत्तर टक्के लोकांनी मोदी विरोधी मते दिली. मात्र मत विभाजनामुळे भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले. त्यामुळे आम्ही इंडिया आघाडी उभी केली आहे. शेतकरी, युवक, महिला, कामगार व सामाजिक न्याय यावर आधारीत काँग्रेसचा जाहीरनामा आहे. असे ते म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR